कोल्हापूर विभागातील चित्र, 25 कारखान्यांची धुराडी अद्यापही
सुरु 16 कारखान्यांचे गाळपही जेमतेम
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
गळीत हंगाम सुरु होऊन सव्वा महिना झाला तरी ऊस पट्टा समजला जाणाऱ्या कोल्हापूर विभागातील 41 पैकी 25 कारखान्यांची अद्याप धुराडीच पेटलेली नाहीत. त्या कारखान्यांनी केवळ गव्हाणीत मोळी टाकण्यापुरताच हंगाम सुरु केला, तर सुरु असलेले 16 कारखानेही जेमतेमच सुरु आहेत. ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर हंगाम लांबणार असून याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
हंगाम लांबला तर शेतकरीच अडचणीत
यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून एका कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर ऊस आहे. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 1 ऑक्टोंबरपासून कारखाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. परंतु परतीचा पाऊस व त्यानंतर सलग कोसळलेल्या अतिवृष्टीने सरकारचे नियोजन बिघडवले. पावसाने उघडीप दिल्यानंतर खऱ्या अर्थाने 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरु झाला. विभागातील कारखानदारांनी हंगाम सुरु करण्याच्या फरसा रस दाखवलेला दिसत नाही. पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास यंत्रणा अपुरी असल्याचे सांगण्यात येते. अशीच चालढकल सुरु झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
कोल्हापूर दहा तर सांगली जिल्ह्यातील सहाच सुरु
कोल्हापूर जिल्ह्यातील 23 पैकी 10 तर सांगली जिल्ह्यातील 18 पैकी 6 कारखाने सुरु आहेत. हे कारखानेही पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत. 15 ऑक्टोंबरला शिरोळच्या दत्त कारखान्याचा पहिला शुभारंभ झाला. या कारखान्याने रविवारअखेर 29 हजार मेट्रीक टन गाळप केले. त्या खालोखाल दौलत, उदयसिंह गायकवाड कारखान्याने गाळप केले असून विभागात अतापर्यंत 5 लाख 8 हजार 874 मेट्रीक टन गाळप झाले असून 3 लाख 89 हजार 76 मेट्रीक क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. उताऱ्यातही घट झाली असून सरासरी 7.65 टक्के उतारा पडत आहे. आणखी काही दिवस उताऱ्यात वाढ होणार नाही असे कारखानदारांकडून सांगितले जात आहे. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने कारखाने सुरु होतील असे सांगितले जात आहे.
हंगाम सुरु न झालेले कारखाने
कोल्हापूर- वारणा, पंचगंगा, कुंभी, बिद्री, भोगावती, शाहू कागल, राजाराम, आजरा, मंडलिक, शरद, गुरुदत्त, हेमरस, महाडिक सांगली- वसंतदादा, साकराळे, हुतात्मा, माणगंगा, महांकाली, वाटेगाव, तासगाव, डफळे, सर्वोदय, मोहनराव शिंदे, यशवंत, केन ऍग्रो
एकुण कारखाने 41
हंगाम बंद 25
हंगाम सुरु 16
झालेले गाळप 508874 मेट्रीक टन
तयार साखर 389076 क्विंटल
सरासरी उतारा 7.65 टक्के
अतिवृष्टीमुळे विलंब
हंगाम वेळेत सुरु करुन गाळप उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी कारखान्यांचा प्रयत्न आहे. मात्र काही कारखान्यांना तांत्रिक अडचण आहेत. तर बहुतांशी कारखान्यांना हंगामात अतिवृष्टीमुळे व्यत्यय आला आहे. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने सुरु होतील
जे. ए. चव्हाण, कार्यकारी संचालक, छत्रपती शाहू कारखाना कागल