प्रतिनिधी / कोल्हापूर
शेंडा पार्क येथे छापा टाकून जप्त केलेल्या २० किलो गांजा प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यापर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राजारामपुरी पोलीसांनी आणखी ४ जणांना अटक करून त्यांचेकडून आत्तापर्यंत ४३ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या गांजासह, २ मोटारसायकल, १ कारसह एकूण १८ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुददेमाल जप्त केला.
पोलीसांनी सांगितले की, कोल्हापुरात गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळाली. त्यांनी आदेश दिल्यानंतर राजारामपुरी पोलीसांनी छापे टाकून कारवाई केली. १९ जून रोजी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथून धनंजय शिंदे (वय- ४०,रा. गांधीनगर, विटा, खानापूर, जि. सांगली), वैभव पाटील (वय३२ रा. तुळजाभवानी नगर, उजळाईवाडी, कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीत सांगली जिल्हयातील विटा येथून २० किलो गांजा कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला होता. तो राजारामपुरी पोलिसांनी जप्त केला होता.
गांजाचे कनेक्शन शोधण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी राजारामपुरी पोलीसांना गांजा प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सोलापुर जिल्हयापर्यंत नेटवर्क राबवत चौघांजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत आणखी गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता ५ दिवसांची कोठडी सुनावली. अधिक तपासात आणखी काही ठिकाणांबाबत माहिती मिळाल्याने पोलीसांना त्या ठिकाणांवर छापे टाकून दुचाकी व चारचाकीसह सुमारे १८ लाख ९ हजार किंमतीचा ४४ किलो गांजा जप्त केला. आजपर्यंतची जिल्हयातील गांजा विरोधात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे शहर पोलीस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.