प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनासह महापुराचे संकट आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात सूट देण्याचा आदेश सरकारने काढला होता. या आदेशानुसार शुल्कात नाममात्र सवलत मिळत आहे. दुसरीकडे शाळा-महाविद्यालयांकडून सक्तीने संपूर्ण प्रवेश शुल्क वसुल करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सरकारने जबाबदारी घ्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांना शिक्षणातून मुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी केली. तसेच दिवाळीपुर्वी प्रवेश शुल्क माफ करा अन्यथा कोल्हापूर, सांगली जिल्हÎातील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार, असा ईशारा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने सौरक्ष शेट्टी यांनी दिला.
पूरग्रस्त शेतकऱयांना सरकारने 135 रूपये गुंठा मदत निधी जाहीर केला आहे. यात चालू हंगामातील पीक लागवडीचे नियोजनसुध्दा होत नाही. दुसरीकडे कोरोना काळात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना संपूर्ण प्रवेश शुल्क भरल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या व्हॉटसऍप ग्रुपमधून काढून टाकले जात आहे. शेतकऱयांच्या मुलांनी शिकायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देवून सरकारपर्यंत भावना पोहचवण्याची विनंती केली. आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी आणलेल्या वह्या पुस्तकांचे पूजन करून, जिल्हाधिकारी कार्यालयाला पुस्तके दान देण्यात आली. तसेच शासन आदेशाची होळी करीत सरकारच्या निषेधार्त शंकध्वनी करण्यात आला. शेतकऱयांच्या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा ईशाराही देण्यात आला. यावेळी तेजस कुलकर्णी, धनंजय टारे, आण्णा सुतार, हेमंत देसाई यांच्यासह स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. – विद्यार्थी समरजितचा सरकारला ईशारा
कोरोना अन् महापुराच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या विद्यार्थ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदत केली नाही. प्रवेश शुल्काविना अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने प्रवेश शुल्क माफ केले नाही तर रस्त्यावर उतरू, असा ईशारा दिला. – समरजित तोडकर (विद्यार्थी)