पेठ वडगाव/ प्रतिनिधी :
पेठ वडगाव येथील शाहूकालीन श्री महालक्ष्मी तलावाच्या बंधाऱ्याच्या पिचींगमध्ये वाढलेली झाडे झुडपे हा बंधारा कमकुवत करत आहेत. हा बंधारा यामुळे कमकुवत होऊन तलावाला धोका होण्याची शक्यता आहे. या तलावाचा बंधाऱ्याची मातीही हळूहळू घसरून बंधारा कमकुवत होत चालल्याचे चित्र आहे. तलावाच्या या बंधाऱ्यावर पेव्हिंग ब्लॉक रस्त्यावरही वाढलेली झुडपे काढून हा परिसर स्वच्छ करण्याची गरज असून दिवसेंदिवस कमकुवत बनत चाललेला हा बंधारा बांधकाम तज्ञांना मजबूत करण्याची गरज आहे.
पेठ वडगाव शहरात असलेल्या शाहूकालीन श्री महालक्ष्मी तलावाचा बंधाऱ्याच्या पिचींगमध्ये दगडाच्या फटीतून उगवलेली झाडे झुडपे आत खोलवर गेली असल्याने त्या वाढल्यानंतर तलावास धोका होण्याची शक्यता आहे. अनेक सेवाभावी संस्थांनी ही झुडपे या पूर्वी काढून तलाव परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याची मुळे खोलवर गेल्याने ही झुडपे पुन्हा वाढत असून सध्या ही झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे तलावास धोका असल्याने ही झुडपे काढून घेण्याबाबत नगरसेवकांनीही सर्वसाधारण सभेत मागणी केली होती. ही झुडपे तात्काळ काढून घेण्याबाबत मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करण्याची गरज आहे. या तलावावर असलेल्या पेव्हिंग ब्लॉक रस्त्यावर झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे एखादा सर्प झुडपात आला असेल तर या ठिकाणी फिरण्यास येणाऱ्या नागरिकाना याचा धोका पोहोचू शकतो. हा तलाव परिसर वडगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा आहे.
वडगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा तलाव महत्वपूर्ण आहे. या तलावाच्या परिसरात असलेले पक्षी वैभव पाहण्यास अनेक पक्षीप्रेमी जिल्ह्यातून येत असल्याने या तलावाची एक वेगळी ओळख आहे. तलाव परिसर जैवविविधता संपन्न आहे. या परिसरात औषधी झाडे आहेत, तर सध्या या ठिकाणी व्यायाम साहित्य तसेच फिरण्यास वॉकिंग ट्रॅकही बसविण्यात आले आहेत. यामुळे हा परिसर वडगाव शहरातील नागरिकांना शुद्ध हवेचे ठिकाण बनला असून सकाळी व सायंकाळी या ठिकाणी नागरिक फिरायला येत असतात.
शहरातील शाहूकालीन असलेला हा श्री महालक्ष्मी तलाव परिसर व तलाव संवर्धन व डागडूजीकडे वडगाव पालिकेचे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या तलावाच्या संवर्धनाकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पालिकेने लवकरात लवकर या बंधाऱ्यावर उगवलेल्या झुडुपे काढण्याबाबत कार्यवाही करण्याची तसेच गेल्या कित्येक वर्षापासून असलेला तलावाचा हा बंधारा यापेक्षाही आणखी मजबूत होईल याबाबत तज्ञाची मते घेवून हा बंधारा मजबूत करण्याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेने कायमस्वरूपी कर्मचारी ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.