कुरुंदवाड/प्रतिनिधी
सध्याचा जुलै व येत्या ऑगस्ट महिन्यात होणारे पाऊसमान हे हवामान खातेनुसार चांगल्याप्रकारे असल्यामुळे कोयना धरणातून पुढे पाण्याचा विसर्ग केल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका टळु शकतो अशी माहिती पर्यावरणाचे अभ्यासक हेमंत बहुलेकर यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली.
वडनेरे समितीचा अहवाल नुसार कर्नाटकातील अलमट्टी जबाबदार आहे की नाही असा वाद नको त्यापेक्षा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर कसा येणार नाही यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
ते म्हणाले आज 15 जुलै रोजी अलमट्टी धरण 72.76 टक्के भरले असून या धरणात पाणी साठा 94.38 टीएमसी आहे त्यामानाने शिरोळ तालुक्यातील कृष्णाची व पंचगंगेची पाणीपातळी खालावली आहे अलमट्टी धरणात 27 हजार 658 क्युसेक्स आवक होत आहे तर येथून पुढे 46 हजार130 विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणातील पाणीसाठा आज 1.84 टीएमसीने कमी झाला आहे.
कोयना धरणात आज 639.91 मीटर पाणीपातळी असून पाणीसाठा 43.36 टीएमसी इतका आहे कोयना धरण आज 41.2 टक्के भरले असून मागीलवर्षी यावेळी 43.23. टक्के भरले होते धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
दरम्यान 1जुन ते 14 जुलै अखेर अलमट्टी धरणात 85 टीएमसी पाणी आले तर 21 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याप्रमाणे महाराष्ट्रातील कोयना धरणातून सध्याची स्थिती लक्षात घेऊन साधारणत 10 -12 टीएमसी पाण्याचा विसर्ग केला तर पुढे पडणाऱ्या पावसामुळे धरणात पुन्हा पाणी साठवता येते, पण हा विसर्ग न केल्यास व धरणात पाऊस जादा झाल्यास पुन्हा एकदा 2019 प्रमाणे महापुराचा धोका संभवू शकतो, यासाठी महाराष्ट्र शासनाने व पाटबंधारे विभागाने समन्वयाची भूमिका घेत कोयना धरणातून आज पासून हळूहळू पाण्याचा विसर्ग केला तर महापुराचा धोका टळू शकतो. महाराष्ट्र शासनाने व पाटबंधारे विभागाने याबाबत जनतेला भयभीत न करता कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करून दिलासा द्यावा जेणेकरून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल. कर्नाटकातील अलमट्टी ला दोष देण्यापेक्षा कोयनेतून पाण्याचा विसर्ग आज पासून सुरू केल्यास निश्चित फरक पडू शकतो असे त्यांनी शेवटी नमूद केले