प्रवीण देसाई / कोल्हापूर
आगामी महापालिका निवडणूक ताकदीने लढविण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. या निवडणुकीची सर्व सूत्रे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांच्याकडे देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे. व्यूहरचना करण्यासाठी दोन्ही खासदारांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार केली जाणार आहे. महापालिका निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी वरीष्ठ पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून त्यासाठी अंतर्गत गटबाजी दुर करावी अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे.
कोल्हापूर महापालिकेत सध्या शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. ही संख्या वाढवून सत्तेत येण्यासाठी दोन्ही खासदारांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा दिली जाणार आहे. कोल्हापूर हा विषय ’मातोश्री’ च्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कोल्हापूरवर विशेष स्नेह होता. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तो जपला आहे. कोल्हापूरचा खासदार व्हावा हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. पुढील ध्येय महापालिकेवर भगवा फडकविणे हे आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाचा खासदार नव्हता परंतु आता पक्षाकडे दोन खासदार आहेत. त्याचा निश्चितच फायदा पक्षाला होऊ शकतो. त्यामुळेच हा विचार पक्षाकडून सुरू आहे.
दोन्ही खासदारांच्या नेतृत्वाखाली एक समिती केली जाणार आहे. यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा सेना जिल्हा विस्तारक हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक सुनील मोदी आदींचा समावेश असू शकतो असे सूत्रांनी सांगितले. कोरोनाचा फटका निवडणूक कार्यक्रमाला ही बसला आहे. त्यामुळे निवडणुकीचा कालावधी ही पुढे जाण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत तर स्वबळावरच
राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आहे. परंतु महापालिका पातळीवर आघाडी करून निवडणुकीला सामोरी जाण्याची शक्यता धुसरच आहे. कारण या तिन्ही पक्षाच्या इचुछकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. दुखवायचे कोणाला ? अशी डोकेदुखी ही नेत्यांना होऊ शकते. त्यामुळे सद्यस्थितीत तर स्वबळावरच लढण्याची तयारी शिवसेनेकडून दिसत आहे.
क्षीरसागर-पवार मनोमिलणाची गरज
महापालिकेवर खरोखरच भगवा फडकवायचा असेल तर प्रथम माजी आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात मनोमिलन होण्याची गरज आहे. यासाठी खासदारांना पहिल्यांदा पुढाकार घ्यावा लागणार आहे. शहरी तोंडवळा असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. परंतु गत विधानसभा निवडणुकीत तो काँग्रेसच्या ताब्यात गेला. त्यामुळे भविष्यात शिवसेनेचा पुन्हा आमदार निवडून आणायचा असल्यास महापालिकेवर भगवा फडकण्याची गरज आहे.