वार्ताहर / खोची
हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे पैकी सोनार्ली धरणग्रस्त वसाहत येथील कोंडीबा पाटणे (वय 35) व जानू भैरू झोरे (वय 38) या दोन युवकांचा अपघाती दुर्देवी मृत्यू झाला. तर आणखी एकजण जखमी असून त्याच्यावर कराड येथे दवाखान्यात उपचार चालू आहेत. ते आपल्या मूळ गावी शित्तुर आरळा (चांदोली धरण) येथे नातेवाईकांची भेट घेऊन परत असताना कराड रत्नागिरी महामार्गावर उंडाळे दरम्यान हा अपघात घडला. या युवकांच्या मृत्यूमुळे धरणग्रस्त वसाहती वर मोठी शोककळा पसरली. हे दोघेजण मुंबई येथे कामानिमित्त स्थाईक होते. लॉकडाऊन काळात पुनर्वसन गावी आल्यावर त्यांच्या कुटुबियांवर प्रसंग ओढावला.
कोंडीबा भागोजी पाटणे, जानू भैरू झोरे व दगडू झोरे हे धरणग्रस्त वसाहतीतील तिघेजण एका दुचाकीवरून दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. सोमवारी रात्री भेंडवडेकडे येत असताना कराड रत्नागिरी महामार्गावरील उंडाळे येथे एका अर्धवट अवस्थेत बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकी खाली कोसळली. यामध्ये कोंडीबा पाटणे व जानू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दगडू झोरे यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. जानू झोरे एकुलते असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, वडील यांचा भार होता.कोंडीबा पाटणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई,भाऊ असा परिवार आहे.
धरणग्रस्त वसाहतीतील हे दोन्ही युवक चरितार्थ चालविण्यासाठी मुंबई येथे कामधंदा करीत होते. कोंडीबा पाटणे एका धनगर समाज संघटनेत राज्य कार्यकरिणीवर कार्यरत होते.तर मुंबई येथे एका दैनिकाचे पत्रकार म्हणून काम करत होते. तर जानू झोरे यांच्या पत्नी भेंडवडे ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होत्या.या दोन्ही अपघाती मृत्यूमुळे धरणग्रस्त वसाहत सुन्न झाली आहे.