प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाची निपाणी-राधानगरी या राज्यमार्गलगत असणारी जवळपास पंधरा फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळली असून इमारतीवरील पत्रेही वादळामुळे उडून गेले आहेत. त्यामुळे दवाखान्यात अनेक ठिकाणी गळती लागून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चाळीस वर्षापूर्वी बांधकाम झालेली इमारत आता जीर्ण झाली असून, भिंतीतून पाणी पाझरून खिडक्या-दारेही फुटलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या दवाखान्यावर दुधगंगा काठावरील पंचवीस गावातील नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. दवाखान्याच्या नवीन बांधकामासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी १५ कोटी ३६ लाख इतकी रक्कम मंजूर केली असून त्याचा आराखडाही तयार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे लवकरात लवकर बांधकाम ठेकेदाराकडून करून घेऊन रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी रुग्णालय पूर्ववत सुरू करावे अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.