घटप्रभा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक : पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
वार्ताहर / गोकाक
पुढील महिन्यात केंद्र शासनाच्यावतीने रेल्वे मंत्री पीयुष गोयल हे लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोल्हापूर-सौंदत्ती दरम्यान भाविक, प्रवासी, जनतेच्या सोयीसाठी व परिसरातील शेतीमाल वाहतुकीसाठी नवीन रेल्वे मार्ग करावा, अशी मागणी पंतप्रधान व रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासंबंधी घटप्रभा दान्नम्मा मंदिर आवारात आयोजित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर गुबलगूड मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, अक्कलकोटचे चन्नबसव देवरु, डॉ. के. डी. वालीकर, एस. आय. बेनवाडे उपस्थित होते.
यावेळी दलवाई पुढे म्हणाले, मिरज-बेळगाव दरम्यान घटप्रभा हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून येथे सर्व रेल्वेगाडय़ांना थांबा आहे. याशिवाय मालवाहतूक ही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या या भागातून कोल्हापूर महालक्ष्मी व कोल्हापूर भागातून सौंदत्ती यल्लम्मा देवीस भाविक मोठय़ा संख्येने बाराही महिने ये-जा करत असतात. याशिवाय गोकाक, गोडचीनमल्की धबधब्यास पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. तसेच परिसरात 12 साखर कारखाने, 7 सिमेंट कारखाने, गोकाक मिल सूत गिरणी स्टार्च फॅक्टरी असल्याने रेल्वेमुळे माल वाहतुकीस मोठा वाव आहे. हे लक्षात घेता केंद्र शासनाने हा नवीन मार्ग करावा, अशी मागणी केली, यासंबंधीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, पाटबांधारे मंत्री रमेश जारकीहोळी, मुख्यमंत्री येडियुराप्पा, कामगार नेते हंबीरराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे.
याचबरोबर मंत्री जारकीहोळी यांनीही यास पाठिंबा दिला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मल्लिकार्जुन स्वामींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन स्वामीजी, डॉ. नाईकवाडी यांनीही मनोगत व्यक्त केले.