ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील महाविकास आघाडीने केलेल्या 15 टक्के बदल्यांवरून भाजप प्रदेशाध्यक्षांनी चौकशीची मागणी केली, पण 2014 पासून चौकशी करू, असे सांगताच त्यांची स्थिती ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ सारखी झाली आहे. विरोधी पक्षनेत्यांचे आंदोलनाचे मुहुंर्त, पंचांगही चुकत आहे. चुकीच्या माहितीवर आंदोलने नकोत तर आधी माहिती घ्या. बिळातून बाहेर या अन् ‘कोरोना’ लढय़ात सक्रीय व्हा, असा सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना दिला. याचवेळी विरोधी पक्षनेत्यांचे पंचांग, मुहुर्त चुकत आहेत, अन् भाजप प्रदेशाध्यक्ष मुक्त विद्यापीठासारखे बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित सदस्यांना टॅब वितरण कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे बदल्या थांबल्या होत्या, त्यापैकी 15 टक्के बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेंतला. या बदल्यांत झालेल्या आर्थिक क्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली. यावर 2014 पासून झालेल्या बदल्यांची चौकशी करू, अशी भुमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. वास्तविक, गेल्या 5 वर्षात विशिष्ट विचारसरणीखाली अधिकारी कार्यरत होते. सत्तांतरानंतर त्यांची विचारसरणी बदलावी, या हेतूने बदल्या केल्या आहेत, त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांची चौकशीची मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली..’ अशीच असल्याची टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते फडणवीस आंदोलने करत आहेत, पण त्यांचे आंदोलनाचे मुहुर्त चुकत आहेत. त्यांचे पंचांग चुकत असावे, जिल्हा परिषदेसमोर भाजप सोमवारी आंदोलन करणार आहे. त्यांनी आंदोलन जरूर करावे, पण तीही वेळ नाही. चुकीची माहिती घेऊन आंदोलन करण्याची ही वेळ नाही, आधी त्यांनी बिळातून बाहेर यावे, अन् कोरोना लढय़ात सक्रीय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष माहिती न घेता एका मुक्त विद्यापीठासारखे बोलत आहे, त्यांनी मुहुर्त पाहूनच आंदोलने करावीत, असा सल्ला दिला.
त्यांच्या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडी अधिक दृढ : मंत्री मुश्रीफ
सत्ता गेल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस अधिक अस्वस्थ आहेत, त्यातून ते वारंवार आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत रहाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या आरोपांनी आम्ही लांब गेलो नाही. उलट तीन विचारधारेचे तीन पक्ष अधिक जवळ आले आहेत. आरोप करण्यापेक्षा आमचे भांडण कसे चाललेय, ते शांतपणे पहा. तुमच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी अधिक सशक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार प्रकरण हे त्यांच्या कुटुंबियांपुरते मर्यादित असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.