भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांचे सरकारला आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने सुरु केलेल्या शिवस्वराज्य दिन अभिमानास्पद आहे. मात्र या निमित्ताने उभारण्यात येणारी गुढी केवळ राजकीय निर्णय न ठरता स्वराज्य आदर्शाची ठरो, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी राज्य सरकारला केले आहे.
यंदापासून शिवराज्याभिषेक दिन `शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला, या ऐतिहासिक निर्णयाचे राजकिय पक्षासह सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत इमारतीवर स्वराज्य गुढी उभारली जाणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी घरावर अशी गुढी उभारुन छत्रपती शिवरायांना मानवंदना द्यावी, असे आवाहनही केले आहे. ग्रामीण भागत हा सोहळा साजरा होत असल्याचे समाधान व्यक्त आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून काही अपेक्षाही व्यक्त होत आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा `राज्याभिषेक दिन’ `शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होत आहे. निश्चितपणे महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद दिवस आहे. परंतु शासनाने हे राज्य स्वराज्याचा आदर्श ठेऊन न्याय आणि नितीने चालवले तर छात्रपती शिवरायांना ती खरी मानवंदना ठरेल. या निमित्ताने शासनाला सद्बुद्धी येवो आणि ही गुढी केवळ राजकिय निर्णय न ठरता स्वराज्य आदर्शाची ठरो, त्यांनी टिव्टमध्ये म्हटले आहे.