तोटय़ातील काजू प्रकल्प आणि व्यवस्थापकाच्या भ्रष्टाचाराला विश्वास्तांचा विरोध : नसिमा हुरजूक यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरची हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप ही संस्था म्हटले की, अपंगांसाठी (दिव्यांग) गेली साडेतीन दशके अवितरण, निस्सिमपणे कार्य करणारी संस्था असा एकमेव शब्द पुढे येतो. मात्र या संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्ष असणाऱया नसिमा हुरजूक यांनी राजीनामा दिल्यानंतर या संस्थेत सुरू असलेल्या अंतर्गंत घडामोडी जगापुढे आल्या. हुरजूक यांचे ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मचरित्र गाजले आहे. अपंगांच्या आत्मसन्मान आणि विकासासाठी लढणाऱया हेल्पर्समधील वाद उघड झाल्यानंतर चाकाच्या खुर्चीला बेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
1984 मध्ये स्थापन झालेल्या हेल्पर्सचा कारभार आणि व्याप वाढत गेला. हुरजूक यांच्याबरोबरीने स्वर्गीय गायिका रजनी करकरे-देशपांडे, मनोहर देशभ्रतार, पी. डी. देशपांडे, श्रीकांत केकडे यांच्यासह इतर विश्वास्तांचे मोठे योगदान राहिले. अपंगांना शिक्षण, प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगिण विकासाचे मुख्य उद्दीष्ट असलेल्या हेल्पर्सने 2005 मध्ये कोकणातील सिंधुदुर्गात स्वप्ननगरीत काजू प्रक्रिया प्रकल्प काढला. गेल्या चार वर्षांत या प्रकल्पात 7 कोटी 75 लाखांची गुंतवणूक करण्यात आली. काजूचा प्रकल्प प्रशिक्षण केंद्र होण्याऐवजी कारखाना झाला. प्रशिक्षणार्थीऐवजी नोकरदार तयार झाले. हेल्पर्सच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. पावणे आठ कोटींची गुंतवणूक केल्यानंतर पहिल्या वर्षी फायदा झाला, नंतर सलग तीन वर्षे तोटा सुरू आहे. हा तोटा सुमारे 1 कोटी 62 लाख एवढा असल्याने विश्वस्त चिंतीत झाले. अशा स्थितीत काजू प्रकल्पात दोन कोटींचे नवीन बांधकाम करण्यासाठी हुरजूक यांचा आग्रह वादाची ठिणगी ठरला. 300 टन काजू प्रोसेस करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पात आवश्यक बांधकाम आहे. तरीही तोटा होत असताना बांधकामासाठी आग्रह धरणाऱया हुरजूक यांना विश्वस्तांनी विरोध केला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत नोकर कपात न करताना दरमहिन्याला कर्मचाऱयांना देण्यात येत असलेल्या 6 लाख रूपये पगारात 50 टक्के कपात करण्याच्या विश्वस्तांच्या निर्णयाला हुरजूक यांनी विरोध केला. त्यातून अंतर्गंत विरोध सुरू झाले. 1 कोटी 75 लाखांचे थकलेले कर्ज, थकलेली बिले काढण्यासाठी राखीव निधीतून 67 लाख रूपये काढण्याची निर्माण स्थिती आणि त्यातून सुरू झालेले हुरजूक यांचे आग्रह इतर 10 विश्वास्तांना आत्मघातकी आग्रह वाटू लागले. त्यातून अंतर पडत गेले. 11 पैकी 10 विश्वस्त एका बाजूला गेल्याने लोकशाही तत्वाने निर्णय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आणि त्यामुळे हुरजूक यांनी आपले निर्णय मान्य होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकल्प प्रमुख, संचालक आणि हेल्पर्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हेल्पर्सच्या विश्वस्त म्हणून त्या आजही पदावर आहेत. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन संस्थेसाठी मोलाचे राहिल, असे उपाध्यक्ष व संघटक पी. डी. देशपांडे सांगतात.
व्यवस्थापकासह दोघांवर भ्रष्टाचाराचा आरोप
हेल्पर्सच्या काजू प्रकल्पात क्व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱया दोघांनी (एक पुरूष कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी) काजू प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा विश्वास्तांचा आरोप आहे. हे दोघेही हुरजूक यांचे निकटवर्तीय आहेत. या दोघांनी उचगाव येथे जागा घेऊन केलेले बांधकाम सुमारे 80 ते 90 लाख रूपयांचे आहे. त्यांनी पैसा कुठून आणला, असा विश्वास्तांचा प्रश्न आहे. या दोघांना नोकरीवरून काढण्याचा ठराव झाला. त्यावर हुरजूक यांनी सही केली. नंतर मात्र त्यांनी ठरावाला विरोध केला. त्या दोघांवर आरोप म्हणजे माझ्यावर आरोप, अशी भूमिका हुरजूक यांनी घेतल्याने त्यांच्यात आणि विश्वास्तांमध्ये अंतर पडत गेले. वादामागे दोन कर्मचाऱयांचा भ्रष्टाचार हे देखील एक कारण असल्याचे सांगितले जाते.