परिसरात घबराट – वनविभागाकडून उपाययोजनांची मागणी
वार्ताहर / कुदनूर
शिवारात गेलेल्या महिलांवर कोल्ह्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना होसूर आणि किटवाड येथे शनिवारी घडली. जखमीमध्ये जिजाबाई मारुती पाटील (होसूर) आणि राजश्री सुनिल इंचनाळकर (कुरयाळ-कर्नाटक) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर नेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. कोल्ह्याच्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी, होसूर येथील जिजाबाई पाटील या शनिवारी सकाळी आपल्या पायरी काटे या नावच्या शेतात पतीसोबत ऊस भांगलणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक कोल्ह्याने त्यांच्यावर जबरी हल्ला करून जखमी केले. लागलीच पतीने आरडाओरड केल्याने कोल्हा शिवारात पळून गेला. जिजाबाई यांना तत्काळ उपचारासाठी नेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर त्याच दिवशी किटवाड येथे शेतात कामासाठी आलेल्या राजश्री इंचनाळकर यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केला असून, त्याही उपचारार्थ नेसरी येथे दाखल झाल्या आहेत. त्या किटवाडच्या माहेरवासीनी असून, त्यांचे सासर कर्नाटकमधील कुरयाळ येथे आहे.
यापूर्वीही चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील भागात कोल्ह्यांकडून शेतकऱ्यांवर वारंवार हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून वेळीच अशाप्रकारच्या घटनांबाबत उपाययोजना करण्यात याव्यात. याशिवाय जखमींना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या चार महिन्यातील पाचवी घटना…
गेल्या चार महिन्यात चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील जंगल भागातील शिवारात कोल्ह्याकडून शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हुंदळेवाडी येथील शिवारात कोल्ह्याकडून हल्ला झाल्यानंतर आता होसूर आणि किटवाड येथील ही पाचवी घटना आहे. वनविभागाने हल्ल्यांचे गांर्भीय ओळखून कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.