कोल्हापूर / प्रतिनिधी
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, यासाठी गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. हा संप बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वर कारवाईला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आज कोल्हापूर विभागातील आठ आगारामधील ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या वर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल, गारगोटी, मलकापूर, संभाजीनगर आणि गगनबावडा आगारातील कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा आगारातील 15 कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
दरम्यान, या सर्व घटनेचे पडसाद मध्यवर्ती बस स्थानक परिसरात उमटत असून वातावरण तणावपुर्ण बनले आहे. जवळपास २00 हून कर्मचारी मध्यवर्ती बसस्थानकात असून आज दुसऱ्यांदा कारवाई केल्यानंतर आम्हालाही कारवाईत सहभागी करून घ्या, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.