इतर जिह्यांच्या तुलनेत गती मंदावली, विशेष लसीकरण मोहिम राबवा- सीईओ चव्हाण
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना लसीकरणात आघाडीवर असलेला कोल्हापूर जिल्हा आता इतर जिह्यांच्या तुलनेत पिछाडीवर राहिला आहे. जिह्यात अत्यंत धिम्या गतीने लसीकरण सुरु असून प्रतिदिन केवळ 30 हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या तुलनेत जवळच्या सांगली जिह्यातील चित्र पाहता एकाच दिवशी लसीचे दीड लाख डोस दिले आहेत. कोल्हापूर हा मोठा जिल्हा असताना देखील लसीकरणाचा वेग मात्र निराशाजनक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरीकांना लस द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
जिह्यात सध्या कोविशिल्ड लसीचे दोन लाख डोस शिल्लक असताना प्रतिदिन केवळ 30 हजार डोस दिले जात आहे. हे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान स्विकारण्याची गरज आहे. यामध्ये एक दिवस महिलांसाठी, एक दिवस 18 ते 45 वयोगटासाठी अशा विविध लसीकरण मोहिमा राबवून प्रतिदिन 1 लाख नागरीकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रामुख्याने करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, कागल या तालुक्यात अधिकाधिक लसीकरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच उर्वरित तालुक्यांनी सर्व गावे 100 टक्के लसबद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे. तरच तिसऱया लाटेपूर्वी अधिकाधिक नागरीक लस घेऊन संरक्षित होणार असून संसर्गाचा धोका टळला जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.