अनगोळ, येळ्ळूर परिसरातील भात पेरणी अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर, अनगोळ, मजगाव, शहापूर, वडगाव, धामणे यासह परिसरात भाताच्या धुळवाफ पेरणीवरच अधिक भर दिला जातो. काही दिवसांपूर्वीच शेतकऱयांनी धुळवाफ पेरणी केली होती. काही शेतकऱयांनी पावसानंतर पेरणी कामाला सुरुवात केली आहे. जवळपास भात पेरणी अंतिम टप्प्यात असून पहिल्या टप्प्यात पेरलेल्या भाताची उगवण बऱयापैकी झाली असून त्यामध्ये कोळपणी करण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाने सध्या उघडीप दिल्याने बळीराजा शेतीच्या कामामध्ये गुंतला आहे. बैलजोडय़ा कमी असल्याने ट्रक्टर, लहान ट्रक्टर यांच्या साहाय्याने मशागत करून भात पेरणीदेखील ट्रक्टरनेच करताना शेतकरी दिसत आहेत. काही ठिकाणी मात्र अजूनही माणसांनी तसेच बैलजोडीच्या साहाय्याने भात पेरणी सुरू आहे. यावर्षी फेब्रुवारीपासूनच या सर्व परिसरात वळवाचा पाऊस पडत होते. मे महिन्यात तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. पाऊस उसंत देणार की नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आठ दिवसांपासून पावसाने बऱयापैकी उघडीप दिली आणि शेतकऱयांनी शिवारातील कामे पूर्ण करून भात पेरणी पूर्ण केली आहे.
अनगोळ शिवारात जवळपास 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतकऱयांनी भात पेरणी केली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि उद्यमबाग येथील कामे बंद आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेऊन पेरणी करण्यासाठी बळीराजा गेल्या आठ दिवसांपासून धडपडत होता. शेतातील तरी कामे तरी पूर्ण करावीत यासाठी साऱयांनीच प्रयत्न केले. अनगोळ शिवारातील शेतकऱयांनी मात्र बैलजोडीनेच पेरणी करण्यावर भर दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अनगोळ, मजगाव यासह इतर परिसरातील शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. विभक्त कुटुंब पद्धती तसेच विविध प्रकल्पांसाठी आणि वसाहतींसाठी जागा घेतल्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक बनल्यामुळे एकमेकांच्या शेतात जाऊन कामे करत आहेत. अनेक शेतकऱयांनी कोथिंबीर, गाजर, कोबी या पिकांची लागवड केली आहे. ती काढून भात पेरणी करण्यासाठी शेतकरी घाईगडबड करताना दिसत आहेत.
येळ्ळूर, वडगाव, शहापूर शिवारातील पेरणीही अंतिम टप्प्यात आहे. जवळपास बहुसंख्य शेतकऱयांनी भात पेरणी पूर्ण केली आहे. आता कोळपणीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. आता कोळपणीच्या कामालाही जोर येणार असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.