कल्पकता आणि प्रयत्न करण्याची तयारी यावर माणूस कुठेही आपला जम बसवू शकतो. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ असे संत तुकारामांचे वचन आहेच. त्याचेच प्रत्यंतर रिंकुकुमार साव या झारखंडमधील तरुण शेतकऱयाने आणून दिले आहे. कोळसा खाणींसाठी उपयोगात आणल्या गेलेल्या आणि त्यामुळे पिकांसाठी निरुपयोगी ठरलेल्या जमिनीत त्याने चक्क स्ट्रॉबेरीच्या मधुर फळांचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. त्याचा हा यशस्वी प्रयोग खाणींमुळे नापीक झालेल्या शेकडो एकर जमिनींसाठी वरदान ठरण्याची शक्मयता आहे.
झारखंड या राज्याचा मोठा भाग कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, या खाणींमुळेच या भागातील लक्षावधी एकर जमीन पिके घेण्यासाठी निरुपयोगी बनलेली आहे. कोळसा खाणीतील कोळसा संपला की खाण बंद पडते. नंतर या जमिनींकडे कोणाचेही लक्ष जात नाही. त्या तशाच पडीक अवस्थेत राहतात.
रिंकुकुमारने अशाच भागातील काही जमीन भाडेतत्वावर घेऊन तेथे स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सुरू केला. पाण्याची व्यवस्था करून तसेच शेणखताचा उपयोग करून दोन वर्षे जमिनीची मशागत केली. त्यामुळे नापीक झालेल्या जमिनीला जीवनदान मिळाले. ती जमीन पुन्हा पिके प्रसवू लागली. चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर स्ट्रॉबेरी झाडांची वाढ सुरू झाली. पुढच्याच वषी पहिले पीक आले. अशा प्रकारे निरुपयोगी ठरलेल्या जमिनीमध्येही जीवन फुलविता येते, हे या शेतकऱयाने दाखवून दिले आहे. रिंकुकुमार हा पूर्वी शहर भागात मजूर होता. तथापि, त्या परावलंबी जीवनात त्याला रस वाटेना. काही वर्षांपूर्वी त्याने दूरदर्शनच्या डीडी किसान या वाहिनीवर कृषीविषयक कार्यक्रम पाहिला. त्यातून त्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली. कोळसा खाणींची जमीन अत्यल्प भाडय़ात मिळत असल्यामुळे त्याने स्वतःची जमीन नसतानाही शेती सुरू केली. गेल्या सहा वर्षात त्याने या प्रयोगात बऱयापैकी यश मिळविले आहे. आता तो आत्मनिर्भर झाला असून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण असे प्रयोग करतील, अशी शक्मयता आहे.