नवाश्म युगात दऱयाखोऱयात वावरणाऱया आदिमानवाला अग्नी आणि शेतीचा शोध लागल्यामुळे त्याच्या जीवनाला स्थिरता आणि स्थैर्य लाभले. कालांतराने कुटुंबव्यवस्था निर्माण झाली. रानावनातली कंदमुळे, पानेफुले आणि फळे त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांचे मांस भक्षण करून जगणाऱया आदिमानवाला चवदार शिजविलेले अन्न खाण्याची चटक लागली. खरेतर अग्नीच्या शोधामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडले तरी त्यातून हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होत गेली. जेव्हा माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळी यंत्रे तयार केली तेव्हा औद्योगिकीकरण आणि नागरीकरण गतिमान होत गेले. एकेकाळी जी कामे मानवी तसेच बैल, रेडा, घोडा आदी प्राण्यांच्या शक्तीवरती केली जायची ती यंत्रांमुळे करणे त्याला आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर वाटू लागले. यंत्र चालविण्यासाठी त्याला जीवाश्म इंधनाचा आधार घ्यावा लागला. दगडी कोळशाच्या ज्वलनामुळे ऊर्जा निर्माण होत असल्याने औद्योगिकीकरणाच्या काळापासून आजतागायत दगडी कोळशाद्वारे प्राप्त होणाऱया उर्जेवरती यंत्रे कार्यान्वित होतात आणि त्यामुळे कोळशाचे ज्वलन करण्याचे प्रमाण जगभर वाढत गेले.
आज जेव्हा वैश्विक तापमान आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱया असंख्य समस्या डोके वर काढू लागल्या आणि मानवी जीवनाला संकटाच्या खाईत लोटण्यास सिद्ध झाले, तेव्हा जीवाश्म इंधनामुळे निर्माण होणाऱया हवा, जल प्रदूषणाची समस्या चर्चेत आलेली आहे. दगडी कोळसा उर्जेसाठी जाळल्यानंतर विषारी आणि प्रदूषणकारी घटक हवेत मोठय़ा प्रमाणात मिसळतात आणि सजीवमात्रांसाठी धोकादायक ठरणाऱया हवा प्रदूषणात विलक्षण भर घालतात. हवेत पारा, शिसे आणि अन्य जड धातुंचे घटक वाढतात तसेच सल्फर डायोक्साईड, कार्बन डायोक्साईड आणि नायट्रोजन डायोक्साईड मिसळून हवेला घातक बनवितात. श्वसनाद्वारे हे विषारी आणि प्रदूषणकारी घटक सजीवांच्या पोटात, नाकात शिरल्या कारणाने दम्याचे, श्वसनासंबंधीचे विकार, कर्करोग, ह्रदयविकार, मानसिक आजार आणि अन्य प्राणघातक रोगात वाढ झाल्याचे बऱयाच ठिकाणी स्पष्ट झाले आहे. दगडी कोळशाच्या ज्वलनामुळे निर्माण होणारी राख हवेत, पाण्यात मिसळून प्रदूषणात भर घालत असल्याचे उघडकीस आलेले आहे.
नदी-नाले, झरे-तलावासारख्या जलस्रोतांत हे प्रदूषणकारी घटक शिरून त्याचे दुष्परिणाम मत्स्य आणि अन्य जलचरांवरती झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. दगडी कोळशाच्या ज्वलनामुळे जगभरात कर्ब वायुच्या उत्सर्जनात वृद्धी होऊन वैश्विक तापमानाच्या संकटात दिवसेंदिवस आणखीन भर पडू लागल्याने अणुशक्ती, जलविदुषित सौर उर्जेसारख्या स्रोतांचा उपयोग करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले तरी विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्रांमार्फत उर्जेसाठी कोळशाचा अधिकाधिक वापर करण्यावरती भर दिला जात आहे. आज जगभरात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायूचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्यात अडकून पडलेला कार्बन जळतो आणि कार्बन डाय ऑक्साईड, मिथेनसारख्या वायूंचे उत्सर्जन वातावरणात होते. एकेकाळी वातावरणात वाढलेल्या कर्ब वायुच्या उत्सर्जनाला नियंत्रित करण्याची कामगिरी निसर्गाद्वारे व्हायची परंतु आज निसर्गाच्या या संतुलनाला धक्का बसलेला असून त्याचेच परिणाम म्हणून वातावरणातील कर्ब वायुचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. एकीकडे वातावरणातील कर्ब वायुचे उत्सर्जन करणाऱया क्रिया वाढल्या असून हा वायू अडकवून ठेवणाऱया निसर्गातल्या घटकांवरती मर्यादा आलेली आहे. जगातील बहुतांश नद्या आणि सागराला जलप्रदूषणाची शिकार व्हावे लागल्याने, सागराच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे फायटोप्लांक्टन व झूप्लांकट यासारखे सूक्ष्म जीव कमी झाले आणि त्यामुळे सागराची कार्बन डाय
ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता संकटग्रस्त झालेली आहे. विकसित देशांबरोबरच आज विकासाच्या वाटेवरती असलेले देश कोळशासारख्या जीवाश्म इंधनाचा वापर करू लागलेले आहेत. कोळशासारखे जीवाश्म इंधन जाळल्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढून वैश्विक तापमानात वृद्धी होणार असल्याचे 1896 साली स्वीडीश शास्त्रज्ञ स्वान्टे अऱहेनियस यांनी प्रतिपादन करून ‘हरितगृह परिणामा’ची संकल्पना मांडून आगामी काळात येऊ घातलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली होती. त्यांनी मांडलेल्या निष्कर्षानुसार पृथ्वीच्या वातावरणाचे जे तापमान असायला हवे, त्यापेक्षा ते 15 अंश सेल्सिअसने ज्यादा असल्याचे स्पष्ट केले. वातावरणातल्या तापमान वाढीला पाण्याची वाफ आणि कार्बन डाय ऑक्साईड हे जबाबदार असल्याचे त्यांनी त्यावेळी मांडले होते. जगभरात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जर दुप्पट झाले तर वैश्विक तापमानात आणखी पाच अंश सेल्सियसने वृद्धी होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली परंतु त्यावेळी स्वान्टे अऱहेनियसच्या प्रतिपादनाला गांभीर्याने घेतले नाही. कार्बन डाय ऑक्साईडचा वायू शोषून घेण्याची प्रचंड ताकद असलेला सागर असल्याने वैश्विक तापमानाची चिंता करण्याचे कारण नाही अशी धारणा झाली. त्यामुळे आज औष्णिक विजेच्या निर्मितीसाठी कोळसा जाळण्याची प्रक्रिया जगभरातल्या विकसित आणि विकसनशील राष्ट्रात निर्धोकपणे चालू आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता आणि प्रगतशील राष्ट्रांनी आपल्या औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी कोळसा मोठय़ा प्रमाणात जाळला आणि त्यामुळे आम्ही कशाला कोळसा जाळणे थांबवावे असा मतप्रवाह सशक्त झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला दगडी कोळशाच्या खाणींची वाढती संख्या आणि दुसऱया बाजूला कोळशाच्या जाळण्याची प्रक्रिया वृद्धिंगत होत असल्याने हवा प्रदूषणात भर पडण्याबरोबरच वैश्विक तापमान वाढीचे संकट गडद होत चाललेले आहे. औष्णिक उर्जेसाठी आज होणारा कोळशाचा वापर नियंत्रित करण्याबरोबरच सौरऊर्जेच्या त्याचप्रमाणे अन्य पर्यावरणपूरक उर्जास्रोतांच्या नियोजनबद्ध वापरावरती लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे.
राजेंद्र पां. केरकर