गेल्या आठवडय़ात ब्रिटनमधील ग्लासगो येथील पर्यावरण परिषदेत कोळशाचा उपयोग संपविण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेत जी-20 अर्थात आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ देशांची महत्वाची भूमिका होती. भारतानेही येत्या 50 वर्षांमध्ये वीजनिर्मितीसाठी कोळशाचा उपयोग पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घोषित केला आहे. कोळशाच्या ज्वलनामुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड असे घातक वायू उत्सर्जित होतात आणि वायू प्रदूषण होते. जगाचे झपाटय़ाने होणारे औद्योगिकीकरण आणि सातत्याने वाढत जाणारी वीजेची मागणी याचा पर्यावरणावर असहय़ ताण पडत आहे, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. तथापि, ‘कळते, पण वळत नाही’ अशी साऱयाच देशांची स्थिती आहे. एकेकाळी कृषी हा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. कृषी व्यवसाय हा निसर्गावरच प्रामुख्याने अवलंबून असल्याने निसर्गाशी जुळवून घेऊनच तो करता येत होता. परिणामी, त्या व्यवसायापासून निसर्ग किंवा पर्यावरणाची हानी एकतर संभवत नसे, किंवा झाली तरी ती आत्ताच्या तुलनेत खूपच मर्यादित आणि निसर्गाला सहन करता येण्याजोगी होत असे. आता परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. जगाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. शिवाय जीवनमानाविषयीच्या संकल्पना बदलल्या आहेत. परिणामी, औद्योगिक उत्पादनाने कृषी क्षेत्राला मागे टाकले असून आता उद्योग आणि कारखानदारी हे उत्पन्न, अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे मुख्य आधारस्तंभ आहेत. उद्योगांसाठी वीजेची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता असते. साहजिकच वीजेची वाढती आवश्यकता भागविण्यासाठी निसर्गात सहज आणि स्वस्त उपलब्ध असणाऱया दगडी कोळशाचा उपयोगही वाढला असून पर्यावरण धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण असेच वाढत राहिले तर काही काही शतकांनंतर श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा पडू शकतो, आणि सजीवसृष्टी धोक्यात येऊ शकते, असा गंभीर इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. पण त्याहीपेक्षा आणि तत्काळ धोका हा तापमानवाढ हा आहे. प्रदूषण निर्माण करणाऱया वायूंमुळे वातावरणात उष्णता अधिक काळ टिकते आणि त्यामुळे जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) चा धोका निर्माण होतो. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आणि अवकाळी पाऊस, दुष्काळ, ध्रूवप्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे आणि त्यामुळे सपाट भूप्रदेश पाण्याखाली जाऊन निरुपयोगी होणे अशी भीषण संकटे संभवतात. त्यांच्या आगमनाची दुश्चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे माणसाला जाग आली आहे खरी, नेमकी उपाययोजना कोणती करावी हे समजेनासे झाले आहे. एकीकडे औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली सुबत्ता त्याला मोहात टाकत आहे आणि ती सोडण्याची त्याची तयारी नाही. याशिवाय आता सर्वच देश औद्योगिकीकरणाच्या मागे लागल्याने त्यांच्यात गळेकापू स्पर्धा आहे. ती जिंकण्यासाठी, किमानपक्षी त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठाही प्रत्येक देशाला धडपड करावी लागते. कित्येक देश बेगुमानपणे पर्यावरणाच्या संरक्षणासाठीचे नियम सरसकट पायदळी तुडवून उद्योग वाढविण्याच्या मागे लागले आहेत. यात अर्थिकदृष्टय़ा प्रगत म्हणवून घेणारे देशच आघाडीवर आहेत. अशा स्थितीत ग्लासगो परिषदेत जी ध्येये ठरविण्यात आली ती निर्धारित कालावधीत पूर्ण होतील काय, हा प्रश्नच आहे. खरे तर माणसाला तापमानवाढीच्या संकटाचा गंभीर धोका 80 च्या दशकापासूनच कळला होता. पण त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले. 90 च्या दशकात असे ठरविण्यात आले की जागतिक तापमान पुढील तीन दशकांमध्ये 2 डिग्री सेंटीग्रेडने कमी करण्यात येईल. तथापि, शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की तापमान कमी होणे सोडाच, पण ते दीड टक्क्याने वाढलेच आहे. आता कोळशाचा उपयोग थांबविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ते कौतुकास्पद आहे. तसेच त्याची आवश्यकताही आहे. पण ते साध्य होईल का हा यक्षप्रश्न आहे. बऱयाच देशांसाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी कोळसा हाच ऊर्जेचा सोयीचा स्रोत आहे. तो ते जगाच्या कल्याणासाठी सोडून देतील ही शक्यता दुरापास्त आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक साहाय्याची आवश्यकता आहे. ती देण्यासंबंधीचा करार ग्लासगो परिषदेत झाला आहे. कोळशाला पर्याय देणारे तंत्रज्ञान विकसीत झाल्यास हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. सौर ऊर्जा हा पर्याय म्हणून समोर येत आहे. तथापि, या मार्गाने वीज निर्मिती करायची, तर प्रारंभी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. गेल्या सात वर्षांमध्ये भारताने त्या दिशेने दमदार पावले टाकली असून जगाने त्याची प्रशंसाही केली आहे. तथापि, अद्यापही त्यात आणखी बरीच प्रगती होणे आवश्यक आहे. तोपर्यंत कोळशाशिवाय तरणोपाय नाही, अशीची स्थिती आहे. एकंदर, कोळसामुक्त वीजनिर्मितीचे ध्येय आदर्श आणि आवश्यक असले तरी येत्या पाच सहा दशकांमध्ये ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे निश्चित आहे. पण केवळ तेवढे केल्यानेही पर्यावरणाची हानी पूर्णांशाने भरुन निघणार नाही. सर्वात चांगला उपाय हा निसर्गस्नेही जीवनशैली स्वीकारणे हाच आहे. निसर्गावर विजय मिळविण्याची उद्दाम आणि अव्यवहार्य महत्वाकांक्षा सोडून देऊन निसर्गनियमांच्या अंतर्गत असणाऱया जीवनाचा अंगीकार करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी भौतिक सुखांचा हव्यास आणि त्यासाठी अहोरात्र (शरीर प्रकृतीकडेही दुर्लक्ष करुन) चाललेली धडपड थोडी कमी कशी करता येईल, हे पाहणे आगत्याचे आहे. आपल्या आवश्यकता आधी अनावश्यकरित्या फुगवून आणि नंतर पूर्ण करण्यासाठी आयुष्य पणाला लावण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करावयास हवा. थोडक्यात, जीवनाचे ‘व्यापारीकरण’ नियंत्रित करणे हा खरा उपाय आहे. हे सांगणे सोपे आहे, करणे कठीण हे खरे असले तरी केल्याशिवाय पर्याय नाही, हे ही तितकेच खरे आहे, याची जाणीव असावयास हवी.
Previous Articleन्यूझीलंडविरुद्ध मालिकाविजयासाठी भारत सज्ज
Next Article स्टार कीडस् झळकण्याच्या तयारीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.