राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा आरोप
प्रतिनिधी/ मडगाव
एमपीटी येथील कोळसा हाताळणीचा विस्तार करण्यासाठी दिगंबर कामत सरकारने परवानगी दिल्याची दोन पत्रे सादर करून बाणावलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस पक्षावर पलटवार केला आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणासाठी केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना मंजुरी मिळविण्यात आली होती, असा दावा आलेमाव यांनी केला असून आता आंदोलनात सहभागी होऊन लोकांची दिशाभूल चालविली असल्याचा आरोप केला आहे.
वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी काँग्रेस व दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेताना आलेमाव यांनी काँग्रेस तसेच सार्दिन यांच्यावर कित्येक प्रत्यारोप केले. दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एमपीटीला कोळसा हाताळणीचा विस्तार करण्यास पत्रव्यवहार करून परवानगी दिली होती, असा दावा करून सदर पत्रे आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत दाखविली.
मंत्रिमंडळाला अंधारात ठेवून अनुमती
5 हजार मेट्रिक टन कोळसा हाताळण्यासाठी दोनवेळा विस्तार करून एकूण 10 हजार मेट्रिक टन कोळसा हाताळण्याची परवानगी देणारी पत्रे दिगंबर कामत यांनी दिल्याचा दावा आलेमाव यांनी केला. त्यावेळी आपणही सरकारात साबांखा मंत्री होतो. मात्र दोन्ही वेळा पत्रे देताना मंत्रिमंडळाला अंधारात ठेवल्याचा दावा त्यांनी केला. कामत आता पत्रांवर आपली सही नसल्याचे सांगत आहेत. मात्र आपला प्रश्न असा आहे की, त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते. त्यांची या विस्तारास संमती होती हे यावरून स्पष्ट होते, असे आलेमाव यांनी सांगितले.
रेल्वेमार्ग दुपदरीकरण निर्णय काँग्रेसच्या काळात
रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा निर्णयही काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना झाल्याचा दावा आलेमाव यांनी केला. आता 270 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून आता विरोध करण्यास काँगेसला जाग आली आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस भाजपवर सध्या आरोप करत असला, तरी त्यातील कित्येक प्रकल्प काँग्रेसनेच आणले होते. कॅसिनो जहाज हे सार्दिन मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आणले गेले, असा दावा त्यांनी केला. म्हादईचे पाणी वळविण्यासाठी प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना पत्र देण्यात आले होते. मोपा विमानतळ काँग्रेसनेच आणला, असे आरोप आलेमाव यांनी केले.
सार्दिन यांनीच राजकीय घेटाळे करण्यास शिकविले
बुधवारी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत खासदार सार्दिन यांनी केलेल्या आरोपांमुळे आलेमाव दुखावल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सार्दिन यांच्यावर चौफेर टीका केली. सार्दिन यांनीच राजकीय घोटाळे करण्यास सर्वांना शिकविल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यावर आरोप करण्यास त्यांना अधिकार नाही. प्रतापसिंह राणे सरकारात शिक्षणमंत्री असताना सार्दिन यांनी त्यांच्या नातलगांपैकी एका विद्यार्थ्याचा केलेला गुणवाढ घोटाळा सर्वश्रुत आहे. त्याचे पडसाद देशभर उमटले होते, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
आपण स्मगलर असल्यास सार्दिन आपले निवडणूक एजंट का राहिले ?
सार्दिन यांनी आपल्याला स्मगलर असे संबोधले आहे. जर आपण स्मगलर होतो, तर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सार्दिन यांनी आपले निवडणूक एजंट म्हणून का काम पाहिले याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे आलेमाव म्हणाले. सार्दिन यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढविताना आपल्याकडून 7 लाख रुपये घेतले होते, असा दावा त्यांनी केला. आपण स्मगलर असल्यास त्यांनी आपल्याकडून ही रक्कम का घेतली याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे, असे ते पुढे म्हणाले.
न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचे लक्षात ठेवावे
आपणास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे स्मगलर म्हणताना सार्दिन यांनी विचार करावा. भाजप सरकारला आपण बाहेरून मुद्यांवर आधारित पाठिंबा दिला आहे. केवळ आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण हा पाठिंबा दिलेला आहे. एनआरसीच्या वेळी अल्पसंख्याकांना ते मारक ठरत असल्यास आपला पाठिंबा नसल्याचे आपण स्पष्ट केले होते, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले. यापूर्वी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करताना पर्रीकर हे आपले भाऊ असल्याचे सार्दिन सांगत होते. आपला रिकॉर्ड साफ आहे. केंद्रातील वाजपेयी सरकार एका मताने पडले त्यावेळी युगोडेपाचे खासदार असताना आपण पाठिंबा दिला नव्हता याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.