वार्ताहर / दोडामार्ग:
चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कोळे रोगामुळे दोडामार्ग तालुक्यातील सुपारी पिकाचे नुकसान झाले आहे. झोळंबे, तळकट, कोलझर, कुंब्रल, कुडासे या गावांसह लगतच्या असनिये, तांबोळी वगैरे भागातील सुपारी पिके सुद्धा धोक्यात आली आहेत. या सुपारी बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी उपसभापती धनश्री गवस यांनी पालकमंत्री, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्यावर्षी तसेच यंदाच्यावर्षीही दोडामार्ग तालुक्यातील अनेक सुपारी बागायतदारांची सुपारी पिके धोक्यात आली. अतिवृष्टीसोबत आलेल्या कोळे रोगामुळेही सुपारी पिकांवर संकट आले आहे. तालुक्यातील झोळंबे, तळकट, कोलझर, कुंब्रल, कुडासे यांसह असनिये, तांबोळी या गावांतील सुपारी बागायतदार हे या सुपारी पिकावरच अवलंबुन असतात. अतिवृष्टी व कोळे रोगामुळे पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी सौ. गवस यांनी केली आहे.