कुटबण जेटीवर आवराआवर सुरू, यावेळी 15 जूनपासून लागू होणार बंदी, मात्र वाढीव मुदतीचा मोठय़ा ट्रॉलर्सनाच फायदा
सुनील फातर्पेकर / कुंकळ्ळी
कोविड-19 चा इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे फटका बसलेल्या मासेमारीचा मोसम संपत आला असून दक्षिण गोव्यातील प्रमुख कुटबण जेटीवर सध्या त्यादृष्टीने आवराआवर चालली असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही मासेमारी बंदी 1 जूनपासून लागू होऊन 31 जुलैपर्यंत चालत असते. मात्र यंदा कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आरंभीच्या काही काळात मासेमारी बंद राहिल्याने बंदीचा काळ नेहमीच्या 61 दिवसांवरून घटवून 47 दिवस करण्यात आला आहे. 14 रोजी ही वाढीव मुदत संपणार आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी व सोमवारी या जेटीला भेट दिली असता ट्रॉलर्समधील जाळी काढून ती वाहनांमध्ये चढविण्याचे काम जोरात चालले असल्याचे दिसून आले. सदर जाळी नंतर नदीच्या पाण्यात धुवून साफ केली जाणार आहे?. त्याचप्रमाणे ट्रॉलर्सवरील कामगारांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. सदर कामगारांची फातोर्डा स्टेडियमवर व्यवस्था केली जात असून त्यानंतर प्रशासनातर्फे त्यांना बस वा रेल्वेने त्यांच्या गावी पाठवले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. कोविडची साथ आल्यानंतर काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी काही ट्रॉलरमालकांनी आपल्या कामगारांना त्यांच्या गावी रवाना केले होते. पण नंतर मासेमारी सुरू झाल्याने आणि ते कामगार परत येऊ न शकल्याने सदर मालक मात्र फसले होते.
घटविलेल्या बंदीचा फायदा मोठय़ा ट्रॉलर्सनाच
कुटबण जेटीवर साधारणपणे तीनशेच्या आसपास ट्रॉलर्स असून एरव्ही मासेमारी मोसम 31 मे रोजी संपत होता. यावेळी पंधरा दिवस जादा मिळालेले असले, तरी नुकतेच येऊन गेलेले वादळ आणि खवळलेला समुद्र यामुळे या वाढीव मुदतीचा मोठे ट्रॉलर्स वगळता बाकीच्यांना फारसा फायदा झालेला नाही. एकंदर वातावरणामुळे छोटय़ा व मध्यम ट्रॉलर्सना समुद्रात फारसे उतरता आलेले नाही. नुकत्याच आलेल्या वादळाचा सुदैवाने जरी ट्रॉलर्सना थेट तडाखा बसलेला नसला, तरी त्यावेळी समुद्रात असलेल्या मोठय़ा ट्रॉलर्सवर परतण्याची पाळी आली होती. सध्या बहुतांश मोठे ट्रॉलर्सच मासेमारीसाठी जात असून रविवारी व सोमवारी रवाना झालेले असे ट्रॉलर्स साधारणपणे आठ ते दहा दिवस समुद्रात राहून मासेमारी करणार आहेत.
मावळत्या मोसमात बांगडे, लेपो आणि अन्य प्रकारचे मासे मोठय़ा प्रमाणात ट्रॉलर्सना गवसलेले आहेत. याशिवाय गोमंतकीयांकडून सेवन न केली जाणारी मासळीही भरीव प्रमाणात जाळय़ात गवसलेली आहे. मात्र या मासळीला गोव्यात मागणी नसल्याने ती केरळ व अन्य राज्यांत पाठविण्यात आल्याची माहिती मच्छीमारांकडून मिळाली. एरव्ही या कालावधीत ट्रॉलर्सना गवसणारे ईसवण हे सहसा सर्वसामान्य खवय्यांच्या वाटय़ाला येत नसत आणि ते कुठे गायब होतात त्याचा पत्ता लागत नसे. त्यामुळे गोमंतकीयांवर स्थानिक ताजी मासळीच्या ऐवजी परप्रांतांतून आणल्या जाणाऱया बर्फातील महागडय़ा मासळीवर समाधान मानावे लागायचे.
गोमंतकीयांना मिळाली ताजी मासळी
मात्र कोविडमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ट्रॉलर्सकडून एरव्ही जशी घाऊक मासळीविक्री व्हायची त्यावर निर्बंध येण्याबरोबर मासळी बाजारही बंद झाले. त्यामुळे ट्रॉलरमालकांकडून मिळेल त्यांना मासळी विकण्यात येऊ लागली तसेच जिथे तिथे मासेविक्री करण्याचे प्रकार सुरू झाले. याचा एक चांगला परिणाम म्हणजे ट्रॉलर्सनी पकडलेल्या ईसवणसह विविध प्रकारची ताजी मासळी गोमंतकीयांना स्वस्तात मिळू शकली आणि फॉर्मेलिनची भीती न बाळगता त्यावर ताव मारता आला. सध्या ट्रॉलर्सच्या जाळय़ात तारले, बांगडे मोठय़ा प्रमाणात मिळू लागले आहेत.
बंदी कमी न करण्याची मागणी
मासेमारीवरील बंदी 15 जूनपासून सुरू होणार असल्याचा फायदा मोठय़ा ट्रॉलर्सच्या मालकांना झालेला असला, तरी छोटय़ा व मध्यम ट्रॉलर्सचे मालक मात्र समुद्रात उतरता न आल्यामुळे या वाढीव मुदतीवर खूष नाहीत. त्यांनी तसेच काही पारंपरिक मच्छीमारांनी 1 ऑगस्ट रोजी मासेमारी सुरू न करता आणखी पंधरा दिवस म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ती बंद ठेवावी आणि मासेमारीची बंदीचा कालावधी 61 दिवसच राखावा अशी मागणी केली आहे. तर काहींनी जूनपासून ऑगस्टपर्यंत अशी 90 दिवस मासेमारी बंदी लागू केल्यास माशांचे प्रजनन चांगल्या प्रकारे होऊन मुबलक प्रमाणात मासे समुद्रात मिळू शकतील, असे मत व्यक्त केले.