आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
विरोधी पक्षाचे नेते कोविड 19 विषयी राजकारण करत असून कुठलाच पुरावा नसताना सरकारवर आरोप करत आहेत. सरकार कोविडसंदर्भात योग्य ती खबरदारी घेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही सुरळीत चालत असून विरोधकांनी विनाकारण सरकारवर तसेच मुख्यमंत्र्यावर आरोप करु नयेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
प्रत्येक राज्यात एसओपी आपल्या स्थितीनुसार बदलत असतात. गोव्यात जे बाहेरुन येतात त्यांची योग्य तपासणी केली जाते. कोविड चाचणी नकारात्मक आल्यास त्यांचे होम क्वारंटाईन केले जाते. काही जणांना सरकारी क्वारंटाईनमध्ये पाठविले जाते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य खात्याचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, अन्य अधिकारी दिवस रात्र काम करत आहेत. आमची समिती प्रधानमंत्र्यांनी नेमलेल्या समितीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन आम्हाला मिळते, असे मंत्री म्हणाले.
आरोग्य खात्यातर्फे चांगले कार्य
सध्या जे गोव्यात येत आहे ते सर्व गोमंतकीय लोक आहेत. अरोग्य खाते चांगले काम करत आहे. एका रात्रीत कोविड हॉस्पिटलच्या 200 बेड वाढविल्या आहेत. तसेच 200 वेंटिलेटर आमच्याकडे आहेत. गोव्यात अनेक कोरोना रुग्ण चांगले होत आहेत. मुख्यमंत्री सर्व परदेशात असलेल्या गोमंतकीयांना सुखरुप गोव्यात आणत आहेत. तसेच सर्वाना समान वागणूक दिली जात आहे. कुणालाच चोरटय़ा मार्गाने गोव्यात प्रवेश दिला जात नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी सरकारला काही सूचना अवश्य कराव्यात, पण विनाकारण मुख्यमंत्र्यांना नको ते शब्द वापरु नये. तसेच कुठल्याच पुराव्याशिवाय सरकारवर आरोप करु नये. हा काळ सर्वानी एकत्र येऊन कोविड लढाई जिंकण्याचा आहे. गोवा सुरक्षित आहे. गोव्यात सर्व व्यवहार सुरु होत आहे. आम्ही सर्व लोकांची काळजी घेण्यास समर्थ आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.