दिगंबर कामत यांची मागणी
पणजी /प्रतिनिधी
गोव्यात आज कोविड मृत्यूने दोन अंकी संख्या गाठली आहे. मागील 24 तासांत दोन मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मडगावातील कोविड इस्पितळात दाखल झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून इस्पितळातील असुविधेची माहिती ऐकल्यानंतर, सरकार रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अजून किती मृत्यूची वाट पाहत आहे. सरकारने रुग्णांप्रति संवेदनशीलता दाखवावी, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच सरकारने ताबडतोब कोविड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवावे, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.
देशव्यापी कोविड लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे समाजातील तज्ञ व लष्कर यांचे कृतीदल स्थापन करुन कोविड महामारीचे व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारने त्याची दखल घेतली नाही. आता गोवा सरकारने अधिक वेळ न घालवता लष्कराला सामावून घेणे गरजेचे आहे.
समाजमाध्यमावर कोविड इस्पितळातील अव्यवस्थेचे फोटो तेथील भयानक परिस्थीती कथन करते. सरकारने तेथिल सुविधा ताबडतोब सुधारण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. सरकारने वेळकाढू धोरण न काढता, ताबडतोब कोविड हाताळणीचा पुढील कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. रुग्णांना योग्य आहार तसेच स्वच्छ पाणी व इतर सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने आखलेल्या उपाययोजना लोकांना कळणे गरजेचे आहे. सरकारने कोविड हाताळणी व व्यवस्थापन यावर त्वरित श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी पुन्हा एकदा श्री. कामत यांनी मागणी केली आहे.