- देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील कोविड सेंटर आणि अन्य ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाइन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तत्काळ तयार करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
ते आपल्या पत्रात म्हणतात की, महाराष्ट्र राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयावर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
सातत्याने वाढणाऱ्या आणि नित्य झालेल्या या घटना पाहता तातडीने प्रामुख्याने कोविड सेंटर्स संदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला अत्याचाराच्या घटना होणार नाहीत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असले पाहिजे, असे नमूद करतानाच या घटनांकडे आपण गांभीर्याने लक्ष द्याल आणि आवश्यक त्या उपाययोजना कराल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.