पाचवीपर्यंतचे वर्ग भरविणे, आरटीपीसीआर सक्ती शिथिलतेबाबत होणार निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग पूर्ण प्रमाणात भरविण्यात येत आहेत. उर्वरित पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत आणि महाराष्ट्र व केरळ राज्याच्या सीमेलगत असणाऱया जिल्हय़ांमध्ये आरटीपीसीआर चाचणी सक्तीचा नियम शिथिल करण्यासंदर्भात येत्या मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली कोविड टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्गही नियमितपणे सुरू करण्याची मागणी पालक आणि शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने हे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी देखील दसऱयानंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कोविड टास्क फोर्सची संमती मिळाल्यानंतरच हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी होणाऱया टास्क फोर्सच्या बैठकीत प्रामुख्याने या विषयावर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हय़ातील कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्मयावर प्रवाशांना आरटीपीसीआर रिपोर्टशिवाय कर्नाटकात प्रवेश देण्यात येत नाही. दरम्यान बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांनी आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घ्यावी, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे यावर मंगळवारीच निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘कृष्णा’ येथे होणाऱया बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश, परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कोविड टास्क फोर्समधील (कोविड तांत्रिक सल्लागार समिती) सदस्य सहभागी होणार आहेत.