आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला : आणखी किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन हवा
प्रतिनिधी / मडगाव
सध्या गोव्यात कोविडची जी दुसरी लाट आली आहे तिला थोपवून धरण्यासाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी लॉकडाऊन, लसीकरण, पारदर्शकता आणि व्यवस्थापन अशी चौसूत्री उपाययोजना हाती घेण्याचा सल्ला दिला असून सध्या राज्यात झालेला कोविडचा प्रसार थोपवून ठेवण्यासाठी आणखी किमान 15 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हटले आहे.
सरकारने या उपाययोजनेकडे गोवा फॉरवर्ड, विरोधक किंवा भाजपची उपाययोजना या दृष्टिकोनातून न पाहता गोव्याच्या जनतेच्या भल्यासाठी सूचविलेल्या उपाययोजना म्हणून पाहावे. सध्या गोव्यात कोविडमुळे 1,274 लोकांना मृत्यू आला आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 24,607 एवढी प्रचंड आहे. गोव्यातील बाधितांची टक्केवारी देशात सर्वांत अधिक असून एवढय़ा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात जे बधितांचे आणि मृतांचे आकडे पुढे आले आहेत ते पहिल्यास येथील स्थिती भयावह आहे, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गोव्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्याची गरज आहे. जेणेकरून वैद्यकीय कर्मचाऱयांना काही प्रमाणात उसंत मिळून ते राज्याला या आणीबाणीच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतील. गोव्याच्या सीमा सील करण्याची गरज असून अत्यंत आवश्यकता असल्यास बाहेरच्या राज्यांतून गोव्यात येणाऱयांना कोविड निगेटिव्ह अहवाल घेऊन प्रवेश देण्याची गरज आहे. अन्यथा स्थिती हाताबाहेर जाऊन प्रशासनावरील ताण अधिक वाढण्याची भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
लोकांनी घरातच राहावे
लोकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घरातच राहावे. असे केल्यास स्वतःबरोबरच दुसऱयांचाही जीव सुरक्षित राहू शकतो. लोकांना गरजेच्या वस्तू मिळतील, तरीही पुढचे पाच दिवस पुरतील एवढे सामान खरेदी करण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. लोकांना कोविडपासून वाचवायचे असेल, तर लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबर वेगवेगळय़ा जागांवर ही सोय उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी आपले ‘गोंयकार घर’ देण्याची तयारी दाखवली आहे. गोव्यातील सर्व लोकांना कोविड लसीचे दोन्ही डोस मिळावेत यासाठी पुरेसा लसांचा साठा उपलब्ध करण्यासाठी गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्राकडून मिळालेल्या 300 कोटींच्या निधीचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोविड उपाययोजना कशी चालविली जाते त्याबद्दल पारदर्शकता असण्याची आणि ही लस कुठे घेता येते, त्यासाठी नोंदणी कशी करण्याची गरज आहे, कुठल्या इस्पितळांत किती खाटा उपलब्ध आहेत, ऑक्सिजन कुठे मिळू शकतो याची पूर्ण माहिती लोकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सरकारने कोविड व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने हाताळण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.