देशात कोरोनाविषयक निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत जारी -संसर्ग टाळण्याचा उद्देश
नवी दिली/ वृत्तसंस्था
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार आता कोविड-19 संबंधित सर्व प्रोटोकॉल 30 सप्टेंबरपर्यंत जारी राहतील. नजिकच्या महिन्याभरात येणारा सणासुदीचा काळ पाहता केंद्राने राज्यांना सतर्क करत स्थानिक प्रतिबंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना संसर्ग पसरण्यापासून रोखणे याच यामागचा मुख्य उद्देश आहे.
कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेले सर्व उपाय पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. केंद्राने देशभरात कोविड-19 प्रोटोकॉल पालनातील कमतरतेबाबत सावध केले आहे. ज्या परिसरात संसर्गाची प्रकरणे कमी आहे, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने नियमितपणे मॉनिटरिंग जारी राहावे. तसेच अधिक बाधित सापडणाऱया भागांमध्ये गर्दीचे कार्यक्रम-उत्सव टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शनिवारी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. यामध्ये देशभरातील राज्यांना कोविड प्रोटोकॉल संबंधित आवश्यक निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.
गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना येणाऱया सणाच्या काळात सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंत्रालयाकडून जारी मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटले आहे की, सणाच्या दरम्यान जास्त गर्दी होऊ नये याकडे लक्ष ठेवावे आणि पाच धोरणे – टेस्ट, ट्रक, ट्रीट, व्हॅक्सिनेशन आणि कोविडसाठी आवश्यक वर्तनावर लक्ष ठेवण्यासह संसर्ग कमी असलेल्या भागात सुरक्षेसाठी टेस्टिंग आणि मॉनिटरिंग जारी ठेवावे, असे सुचविले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या 40 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. यापैकी जास्त रुग्णांची नोंद ही महाराष्ट्र आणि केरळात करण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाईट कर्फ्यू लावण्यावर विचार करण्यास सांगितले आहे. केरळात काही दिवसांपूर्वी ओनम सण मोठय़ा गर्दीत साजरा झाल्यानंतर झपाटय़ाने रुग्णवाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.