- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये असा समज सर्व पक्षांच्या नेत्यांना देण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधानांकडे केली आहे.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेे .
एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. तसेच 25 वर्षापुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमिडेसेवीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावं. रेमिडेसेवीरचा अती व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयसीएमआरला केली आहे.
हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं असलं तरी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले आहे.