प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यातील कोरोनाबाधितांवर येथेच उपचार व्हावेत, देखरेखीखाली व्यक्तेंना रत्नागिरीत न्यावे लागू नये यासाठी सावर्डे-वहाळफाटा येथील मुलींच्या वसतिग़ृहात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र येथे सफाई कामगार मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर व इतर कर्मचाऱयांना रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच अन्य कामे करावी लागत आहेत. जेवण पुरवणाऱयालाही कामगार मिळेनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत आमदार शेखर निकम प्रशासनाला मदतीचा हात देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. यापूर्वी अशा रूग्णांवर कामथे, जिल्हा रूग्णालय, खेड-कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र तेथील जागा फुल्ल होत असल्याने वरील ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे बाधित व संशयित रूग्ण असे दोन विभाग असून शंभर बेडची व्यवस्था आहे. याशिवाय गाद्या, पाणी, जेवण, नाष्टा, बेडशीट, स्वतंत्र खोल्यांची सुविधा आहे. रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, सफाई कामगार यांचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. येथे आवश्यक तो औषधसाठी उपलब्ध करण्यात आला असून 108 रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे.
सध्या येथे 30 कोरानाबाधित, तर 28 जण देखरेखीखाली आहेत. त्यांना वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र येथे एकच सफाई कामगार असल्याने या मोठय़ा परिसराची त्याला नियमित साफसफाई करणे कठीण होत आहे. त्यातच सफाई बरोबरच त्यांना पाणीपुरवठा करणे, चहा देणे ही कामेही अनेकदा त्यांच्यावरच पडतात. त्यामुळे तोही हैराण झाला आहे. येथे बाधित रूग्ण असल्याने कोणीही कामावर येत नाही. प्रशासनाकडेही तितकेसे कर्मचारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
येथे असणाऱया रूग्ण, देखरेखीखाली व्यक्ती, डॉक्टर व अन्य कर्मचारी मिळून सुमारे 100 जणांना दररोज सकाळी नाष्टा, चहा, दुपारी, रात्री जेवण द्यावे लागते. यालाही फार उशीर होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मात्र जेवण बनवणारा व्यक्ती कोविड सेंटरमध्ये जेवण देत असल्याने त्यांच्याकडेही सर्वजण वेगळय़ा नजरेने बघत असून भीतीपोटी कोणीही कामावरही जात नाही. त्यामुळे इतक्या लोकांचे जेवण तेही वेळेत बनवायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तरीही तो तयार करून देत असलेले जेवण रूग्ण व देखरेखीखालील व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम डॉक्टर व अन्य कर्मचारी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील पंख्यामध्ये बिघाड झाला. ते दुरूस्त करण्यासाठीही खासगी व्यक्ती मिळणे कठीण बनले. त्यामुळे अखेर हे काम महावितरणच्या कर्मचाऱयांकडून करून घेण्याची वेळ प्रशासनावर आली.
तहसीलदारांची सेंटरला भेट
या समस्या तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यापर्यत गेल्यावर त्यांनी मंगळवारी या सेंटरला भेट दिली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एक कर्मचारी उपलब्ध करून दिला. तसेच जेवणही वेळेत कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी पुरवठादाराला केल्या आहेत.
शेखर निकम यांचे सहकार्य
हे सेंटर आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यातून सुरू झाले आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवण्यासाठी ते प्रशासनाला कायमच सहकार्य करीत आहेत. यातूनच त्यांनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे.