क्रिकेट ऑस्ट्रेलिया अध्यक्षांची आयसीसीला चपराक,
सध्याच्या कठीण कालखंडात विश्वचषक स्पर्धा भरवणे अव्यवहार्य असल्याची भूमिका
मेलबर्न / वृत्तसंस्था
‘कोव्हिड-19 चे संकट सातत्याने प्रचंड हानी करत असताना यामुळे यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवणे शक्य होणार नाही’, अशी स्पष्ट कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी मंगळवारी दिली. 16 देशांचे संघ ऑस्ट्रेलियात दाखल होणे या परिस्थितीत शक्य नाही, असे कारण त्यांनी दिले. कितीही प्रतिकूल परिस्थितीत नियोजित रुपरेषेप्रमाणे यंदाचा टी-20 विश्वचषक खेळवणारच, अशी ठाम व आग्रही भूमिका घेत आलेल्या आयसीसीसाठी ही अर्थातच मोठी चपराक ठरली आहे.
नियोजित रुपरेषेप्रमाणे यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणे अपेक्षित आहे. आयसीसीने त्यासाठी जोरदार चंग बांधला आहे. पण, प्रत्यक्षात परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे, त्याकडे आयसीसीने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर 8.1 दशलक्ष नागरिक कोव्हिड-19 मुळे त्रस्त आहेत.
‘माझ्या मते यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार नाही. आताच्या परिस्थितीत प्रत्येक देशात कोव्हिड-19 चा प्रकोप खूपच पसरला आहे. यामुळे अपरिमित हानी झाली आहे. अशा परिस्थितीत यातील 16 संघांनी ऑस्ट्रेलियात यावे आणि येथे विश्वचषक स्पर्धा खेळावी, हे निव्वळ अशक्य आहे’, असे एडिंग्ज यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्पष्ट केले.
आयसीसीने मागील आठवडय़ातच झालेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी उपलब्ध पर्याय आजमावून पाहण्याचा आपला विचार असल्याचे आयसीसीने तेथे स्पष्ट केले. सध्याची स्थिती पाहता, आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली जाईल आणि त्याच टाईम विंडोमध्ये भारतातील आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल, असे एकंदरीत चित्र आहे. आयपीएल स्पर्धा सध्या अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे.
जगभरात कोव्हिड-19 च्या प्रकोपावर जे मोजके देश नियंत्रण ठेवण्यात आतापर्यंत थोडेफार यशस्वी झाले आहेत, त्यात ऑस्ट्रेलियाचा प्राधान्याने समावेश आहे. पण, यानंतरही यंदा ऑस्ट्रेलियन भूमीत टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवणे व्यवहार्य ठरणार नाही, असे त्यांनाच वाटते. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत कोव्हिड-19 चे 7 हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी थोडेथोडेके नव्हे तर 6 हजार पेक्षाही अधिक जण त्यातून बरे झाले आहेत.
…तर बीसीसीआयचे 4 हजार कोटींचे उत्पन्न बुडणार!
यंदा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणे अशक्य कोटीतील असेल, याची कल्पना आयसीसीला यापूर्वीच आलेली असू शकते. पण, यानंतरही त्यांनी विविध पर्याय आजमावण्याचे कारण देत आपला निर्णय पुन्हा एकदा पुढील महिन्यापर्यंत राखून ठेवला आहे. जोवर आयसीसीकडून टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल निर्णय जाहीर होत नाही, तोवर आयपीएलला देखील यंदाची रुपरेषा आखता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याच वर्षी आयपीएल भरवली जाईल, अशी ग्वाही दिली. पण, यानंतरही स्पर्धा काही कारणामुळे होऊ शकली नाही तर बीसीसीआयचे 4 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडू शकते, असे खजिनदार अरुण धुमल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया सीईओ केव्हिन यांचा राजीनामा
कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी झुंजत असताना त्यातच सीईओ केव्हिड रॉबर्टस् यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केव्हिन यांचा राजीनामा स्वीकारला असून निक हॉकली यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी जाहीर केले. निक हॉकली हे सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे मुख्य कार्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. केव्हिन रॉबर्टस् यांनी आपल्या आठ वर्षांच्या कालावधीत मोलाचे योगदान दिले आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी नमूद केले. रॉबर्टस् यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये जेम्स सुदरलँड यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असेल, असे जाहीर केले गेले होते.