बेंगळूर / वृत्तसंस्था
कोव्हिडविरुद्धचे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे. केवळ पहिल्या डावाअखेर आघाडी घेऊन एखादी कसोटी जिंकता येत नाही, त्यासाठी दुसऱया डावातही नियंत्रण कायम राखावे लागते, त्याप्रमाणे हे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे. एका दृष्टीने आताची परिस्थिती कसोटी क्रिकेटमधील दुसऱया डावासारखीच आहे, असे प्रतिपादन माजी भारतीय कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी केले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा क्रीडा जगताला मोठा झटका बसला असून त्या पार्श्वभूमीवर कुंबळे बोलत होते.
‘जर कोव्हिडविरुद्धची ही लढाई एकदिलाने लढायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम एकत्रितरित्या लढत द्यावी लागेल. ही स्थिती एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे आहे. अर्थात, कसोटी सामने फक्त पाच दिवसापुरते असतात. कोव्हिडची लढाई त्यापेक्षा अधिक प्रदीर्घ चालत आली आहे’, असे कुंबळे ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओच्या माध्यमातून म्हणाले.
‘क्रिकेट कसोटी सामन्यात फक्त दोन डाव असतात. पण, इथे त्यापेक्षा अधिक प्रमाणात लढावे लागत आहे. कसोटीचाच निकष लावायचा तर पहिल्या डावात आपण बऱयापैकी नियंत्रण राखले आहे. पण, दुसऱया डावात खेळणे अधिक कठीण, अधिक आव्हानात्मक असते. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. ती फक्त पहिल्या डावातील आघाडीवर जिंकता येणार नाही. त्यासाठी दुसऱया डावातही अधिक ताकद पणाला लावावी लागेल’, असे कुंबळे यांनी पुढे नमूद केले.
कोरोनाविरुद्ध लढय़ात मुख्य सहभाग असणाऱया योद्धय़ांचेही कुंबळे यांनी येथे आभार मानले. डॉक्टर, नर्सेस, अटेंडर्स, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक, सरकारी कर्मचारी, पदाधिकारी, पोलीस हे सर्वच घटक अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत. रुग्णांना वाचवण्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत, असे कुंबळे शेवटी म्हणाले.