शासकीय रूग्णालयात धक्कादायक प्रकार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात रविवारी राजीवडा येथील एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा आयसीयुमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही माहिती कळताच नातेवाईकांना आयसीयुमध्ये जावून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱयांच्या विरोधाला न जुमानता जमावाने मृतदेह जबरदस्तीने नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना रूग्णांवर आवश्यक ते सर्व उपचार केले जातात. मात्र काही वेळा उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने रूग्णाचा मृत्यू होतो. रविवारीही असाच एका पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर केवळ गैरसमजातून नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून मृतदेह ताब्यात घेतला. आम्ही नातेवाईकांना खूप समाजावण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने या समूहासमोर आम्हाला काही करता आले नाही अशी माहिती शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली.
कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अन्य लोकांना संसर्ग होऊ नये यासाठी सर्व ती खबदारी घेत कायदेशीर बाबींची पुर्तता करत शासकीय नियमांनुसार आरोग्य विभागाकडून त्या मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही, मात्र अंत्यसंस्कारा काही नातेवाईकांना सुरक्षीतेतीची काळजी घेऊन अनुमती दिली जाते. मात्र रविवारी घडलेल्या प्रकारामुळे मृतदेह ताब्यात घेणाऱया व अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांनाही संसर्गाचा धोका असल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समाजते. या प्रकारानंतर कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱया वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने नातेवाईकांमधील गैरसमज वेळेत दूर करणे आवश्यक असल्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱयांनी केली आहे.