प्रतिनिधी/ सातारा
गेल्या तीन चार महिन्यापासून सातारा जिल्हय़ातील वातावरण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पॅनिक आहे. त्यातून थोडा बाधित वाढ मंदावल्याचा दिलासा मिळत असताना लॉकडाऊनमधून सुटका झाल्याने नागरिक जगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मधूनच मृत्यूचे भयावह आकडे समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरते. याला कारणीभूत आहेत उशिरा मृत्यू अहवाल सादर करणारी जिल्हय़ातील कोव्हिड हॉस्पिटल्स. त्यांना कारणे दाखवा नोटीसा, इशारा दिला, बैठका घेवून खुद्द जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सूचना केल्या तरी हॉस्पिटल्सकडून बेशिस्तपणा सुरुच आहे.
जिल्हय़ात दुसऱया लाटेपासून सुरु असलेला कोरोनाचा कहर तीन अंकावर स्थिर आहे. तो संपण्याची चिन्हे दिसत असतानाच एखाद्या दिवशी मृत्यूचा भयावह आकडा समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनावर भितीचे सावट पसरत आहे. हे भितीचे सावट पसरवण्यास 105 कोव्हिड हॉस्पिटल्सपैकी काही उशिरा मृत्यू अहवाल सादर करणारी हॉस्पिटल्स कारणीभूत असून आता या हॉस्पिटल्स चालकांची आरोग्य मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शनिवारच्या अहवालात एकाच दिवशी 54 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिल्यानंतर माध्यमांसह नागरिकांना धक्का बसला. याबाबत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या अनुषंगाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शनिवारच्या अहवालातील 54 मृत्यूपैकी 17 मृत्यू फक्त त्या दिवशीचे आहेत व तर 37 मृत्यू हे गत महिन्यातील वेगवेगळय़ा तारखांचे असून ते अपलोड करण्याचे राहिल्याने हा आकडेवारीचा घोळ समोर येतो आहे.
याबाबत ‘तरुण भारत’ने अनेकवेळा बाधितांची व मृत्यूची आकडेवारी रोजच्या अपडेट होण्यासाठी पाठपुरावा केला होता. कोरोना अपलोड घोटाळय़ामुळे त्याचा परिणाम त्या त्या वेळीच्या स्थितीवर होत असतो. जर कोव्हिड हॉस्पिटल रुग्णांना चांगली सेवा वाचवण्याचा प्रयत्न करुन राष्ट्रकार्य करत आहेत तर मग मृतांची व बाधितांची आकडेवारी भरण्याचे कामही देशकार्य समजून करण्याची गरज आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरात आरोग्य विभागाकडून या हॉस्पिटल्सना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकाऱयांनी संबंधित हॉस्पिटल चालकांची बैठक घेवून सर्वांना आकडेवारी अपडेट ठेवण्याबाबत सूचनाही केल्या आहेत.
मात्र, तरी देखील काही असे नव्हे तर जवळपास सर्वच छोटी, मोठी हॉस्पिटल्स तांत्रिक कारण, डाटा एंट्री ऑपरेटर मिळत नसल्याने बाधित व मृतांची माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर भरत नाहीत. त्यामुळे त्यांना वारंवार सूचना पत्र पाठवण्यात आली आहेत. ज्यांना तांत्रिक अडचणी होत्या त्यांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ही आकडेवारी लवकरच अपडेट राहील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.