आयसीएमआर-भारत बायोटेकचा सहभाग
बेंगळूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त सहभागातून आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कोविड लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते बुधवारी बेंगळूरमध्ये तिसऱया टप्प्यातील चाचणीला प्रारंभ करण्यात आला.
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत आयसीएमआर आणि भारत बायोटेक संस्थेने कोरोनावर कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी बेंगळूरमधील व्हाईटफिल्ड येथील वैदेही इस्पितळात सुरू झाली आहे. येडियुराप्पा यांनी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथून ऑनलाईनच्या माध्यमातून चाचणीचा शुभारंभ केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी, बेंगळूरमधील इस्पितळात आत्मनिर्भर योजनेंतर्गत लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी होत आहे. स्वदेशी बनावटीच्या या लसीमुळे कोरोनाविरुद्धच्या लढय़ाला बळ मिळणार आहे. 1100 जणांवर चाचणी केली जाणार आहे. या चाचणीमध्ये युवकांनी स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.