खेडशी नवेदरवाडी येथील सोमवार सकाळची घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी नवेदरवाडी येथे सोमवारी सकाळी मोठा अनर्थ घडता घडता टळला. अनंत लक्ष्मण सावंत यांच्या घराशेजारी सुमारे महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेली मोठी संरक्षक भिंत यादिवशी झालेल्या धुवाँधार पावसाने कोसळून सावंत यांच्या घरावर घरंगळत गेली. सुदैवाने अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी सकाळी रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळला. सकाळी 9.45 ते 10.30 वाजण्याच्या सुमारा पडलेल्या या पावसाने खेडशी नवेदरवाडी येथे संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. अनंत सावंत यांच्या घराशेजारी असलेल्या रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे. या भिंतीची उंची सुमारे 6 ते 7 फुट उंच इतकी असल्याचे सांगितले जाते. या भागात पडलेल्या जोरदार पावसाने या भिंतीचा मोठा भाग कोसळून पडला. त्यावेळी भिंतीचे चिरे सावंत यांच्या घराच्या भिंतीवर जाऊन आदळले. घराबाहेर मोठा आवाज व त्याचे दणके जाणवल्याने घरातील माणसांची चांगलीच भितीने गाळण उडाली. बाहेर जाऊन पाहिल्यावर कोसळलेल्या भिंतीचे चिरे घरावर आल्याचे पाहून साऱयांनाच धस्स झाले. याबाबतची खबर स्थानिक स्तरावर देण्यात आली असल्याचे सावंत कुटुंबियांकडून सांगण्यात आले.