आपण देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल खूप काही ऐकतो व बोलतोही. आपण आपल्या अर्थमंत्र्यांकडून खूप अपेक्षाही ठेवत असतो. मात्र आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या अर्थसंकल्पाबाबत तेवढे सतर्क नसतो. कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?
कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चाचे योग्य नियोजन. आपल्या पगारातील किंवा व्यवसायातील उत्पन्न आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्वाचे. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. 1) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च 2) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च 3) दैनंदिन खर्चासाठी बचत 4) दीर्घकालीन स्वपनांसाठी गुंतवणूक. यासाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे.
आपली अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्ने आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्मयात असतील व त्यासाठी आपल्या पूर्ण नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन गाडी, नवीन किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, लग्न तसेच निवृत्ती नियोजन वगैरे हे झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.)
स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण येणाऱया खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे.
महागाईमुळे होणारी खर्चातील संभावित वाढ लक्षात नाही घेतली तर आपल्या कुटुंबाचा अर्थसंकल्प कोलमडू शकतो. नियोजन केल्यास कोणताही ताण न घेता आपण ठरवलेल्या तारखेला आपली स्वप्नपूर्ती करू शकतो.
दैनंदिन खर्चाचे प्रभावी नियोजन कसे करावे?
महिन्यातील खर्चाची यादी बनवावी. ज्यामध्ये नियमित खर्च (जसे वीज/टेलिफोन/गॅस बिल वगैरे) व अनियमित खर्च (जसे मॉल शॉपिंग, उपाहारगृह, सहल वगैरे) लिहावेत. हे खर्च भागवण्याकरिता आपल्याला बचतीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण बँकेचे बचत खाते, आवर्ती जमा खाते किंवा म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड फंडामध्ये बचत करू शकता. या खर्चाचे नियोजन करताना महागाईचाही विचार आवश्यक आहे. तसेच, शॉपिंगला जाताना खरेदीची यादी जवळ बाळगावी जेणेकरून आवश्यक सामानाचीच खरेदी करू.
आजच्या मॉल संस्कृतीमध्ये बऱयाच वेळा आपण अनावश्यक गोष्टी जास्त खरेदी करतो, ज्या आपण क्वचितच वापरतो किंवा पडून राहतात. आपल्या दैनंदिन खर्चाचा आढावा दर 3-4 महिन्यांनी घ्यावा त्यामुळे खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करण्याकरिता ठराविक रक्कम बाजूला काढणे व उरलेल्या रकमेत आपले दैनंदिन खर्च भागविले पाहिजेत.
जीवन विमा व आरोग्य विमा याची तरतूद किती महत्वाची आहे?
कुटुंबप्रमुखाचा मोठय़ा रकमेचा मुदतीचा विमा असणे अतिशय महत्वाचे आहे. मुदतीच्या विम्यात कमी हप्त्यात जास्त विमा कवच मिळते, त्यामुळे विमा हप्त्याची तरतूद अत्यावश्यक आहे. तसेच घरात कधी काही मोठे आजारपण आले तर आपल्या नियोजनावर त्याचा भार पडतो व आपले अर्थसंकल्प कोलमडू शकते. पूर्ण कुटुंबाच्या आरोग्य विमाची तरतूद केल्याने असे खर्च विमा कंपनी उचलते व आपल्या आर्थिक नियोजनाला कोणताही धक्का लागत नाही.
आपला कौटुंबिक अर्थसंकल्प आपल्याला योग्य गुंतवणुकीसाठी कशी मदत करतात?
जेव्हा आपण अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्वप्ने किंवा ठराविक उद्दिष्टे ठरवितो तेव्हा त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक योग्य ठरेल ते आपण आपल्या नियोजनातून ठरवू शकतो. आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आपण बँकेच्या बचत खात्याचा उपयोग करू शकतो.