वार्ताहर / मणेराजुरी
सावर्डे (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे (वय 27), हिंदुराज बाळासाहेब सदाकळे (वय 7) आणि धनुष्य बाळासाहेब सदाकळे (वय 3) अशी त्यांची नावे आहेत. ही दुर्घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण तासगाव पूर्वभागासह सावर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळ व तासगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, चंदाराणी हिचा दहा वर्षांपूर्वी सावर्डे येथील बाळासाहेब सदाकळे याच्याशी विवाह झाला होता. बाळासाहेब हा काही काळ दुसऱयाच्या किराणा दुकानमध्ये कामास होता. सध्या त्याने गावात स्वतःची छोटीशी बेकरी सुरू केली आहे. जोडधंदा म्हणून एक ओमनी गाडीतून शाळेच्या मुलांना सोडण्याचे काम करीत आहे. त्यातूनच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललो.
बाळासाहेब व चंदाराणी यांचा संसार दहा वर्षांपासून आनंदाने सुरू होता. त्यांच्या संसाराच्या वेलीवर हर्षद उर्फ अभिराज (वय 9), हिंदुराज (वय 7) व धनुष्य (वय 3) ही तीन मुले जन्माला आली होती. हर्षद हा तिसरीमध्ये, हिंदुराज हा पहिलीत शिकत होता. तर धनुष्य हा अंगणवाडीत जात होता. किरकोळ कारणावरून पती-पत्नीत नेहमी भांडणे व्हायची. बुधवार, 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. त्यांच्या कौटुंबिक कारणातून वादावादी झाली. चंदाराणी रागाच्या भरात अभिराज व हिंदुराज या दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली.
घरातील सर्वांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते मिळून आले नाहीत. शेवटी पती बाळासाहेब सदाकळे (वय 36 ) यांनी शुक्रवार, 10 जानेवारी रोजी तासगाव पोलिसात पत्नी व दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच पुन्हा शोधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
रविवारी 12 जानेवारी रोजी गावातील लोढे रस्त्यावरील दिलीप पाटील यांच्या पडक्या विहिरीत एक महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. तो मृतदेह चंदाराणीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनेनंतर धनुष्य व हिंदुराज यांची शोधाशोध केल्यानंतर त्यांचेही मृतदेह त्याच विहिरीत तरंगताना आढळून आले. या घटनेनंतर संपूर्ण सावर्डे गाव हादरले. तिघांचे मृतदेह पाहताच पती बाळासाहेब, मुलगा हर्षद आणि सासू-सासरे यांच्यासह सदाकळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या घटनेनंतर सावर्डे गावावर शोककळा पसरली असून तासगाव पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन तासगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या आत्महत्येच्या घटनेने गाव व परिसर मात्र सुन्न होता.
नशीब बलवत्तर म्हणून हर्षद वाचला
बुधवारी आठ जानेवारी सायंकाळी हर्षद बाजारात गेला होता. त्याचवेळी घरी भांडण झाले. यामध्ये चंदाराणी रागाच्या भरात घरातून निघून गेली. जाताना धनुष्य आणि हिंदुराज यांना घेऊन गेली. जर हर्षद घरी असता तर त्यालाही घेऊन गेली असती. त्याचे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पण, आई आणि दोन भावंडांचा मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. त्याचा हंबरडा पाहून उपस्थितही गहिवरले.
क्षणाचा राग आणि आत्महत्या
चंदाराणीला आलेला क्षणाचा राग हा संपूर्ण कुटुंबाला आघात ठरलाच. पण तिघांच्या मृत्यूचे कारण ठरला. धनुष्य आणि हिंदुराज यांचे मृतदेह एकमेकांच्या हातात हात घालून तरंगत होते. हे दृश्य पाहून काळजाचे पाणी पाणी झाले. घटनास्थळी सावर्डे परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.