आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील माणगंगा नदीवरील सांगली व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा पुल सध्या धोकादायक बनला आहे. अतिवृष्टीमुळे या पुलाचा भराव लोटेवाडी कडील बाजूस वाहून गेला आहे. या पुलालगत भगदाड पडले असून त्याकडे तीन महिने दुर्लक्ष झाल्याने कौठळी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कौठुळी येथील दिनेश कदम, सतीश कदम, अजित लिगाडे, समाधान कदम, संभाजी कदम आदींनी आटपाडी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन माणगंगा नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याकडे लक्ष वेधत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.