महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात-
कालिङ्गप्रमुख दृप्त नृपति । विदर्भाचे पक्षपाती ।
केवळ दृष्टात्मे दुर्मति । ते रुक्मी बोधिती दुर्मंत्रें ।
प्रभाते यादव सुमुहूर्तीं । नोवरी घेऊनि द्वारके जाती ।
यालागीं कांहीं विदर्भनृपति । रहस्ययुक्ति अवधारि।
द्यूतकर्मीं अप्रवीण । द्यूतक्रीडेचें वाहे व्यसन ।
वृथाभिमानी संकर्षण । अनक्षज्ञ जिंकावा ।
तो हा बळभद्र विदर्भराया । प्रसंगें आला विवाहकार्या । द्यूतीं प्रतिज्ञा करूनियां । जिंकावया प्रवर्तिजे ।
कौतुकें मांडूनि द्यूत खेळ । आम्ही प्रेक्षक बैसूं सकळ । अक्षविद्येनें जिंकूनि बळ । मागील सळ उमचावें ।
द्यूतक्रीडेचा अभ्यास । नाहीं बलरामा निःशेष ।
अतज्ञ असोनि तो हव्यास । अंगीं बहुवस वाहतसे ।
ऐसा रुक्मी कालिङ्गप्रमुखीं । बोधितां ऐकूनि भरला तंवकीं ।
दुर्बुद्धि देऊनि काळमुखीं । होमिती ऐसें उमजेना ।
कामुका पराङ्गनेची रति । दुर्मित्र जैसे योजोनि देती । परी शूळारोपण नरकावप्ति । हे विपत्ति त्या नुमजे ।
तैसाच कालिङ्गप्रमुखीं राया । रुक्मी दुर्मंत्र बोधूनियां । प्रवर्तविला द्यूतकार्या । तत्कृतचर्या अवधारिं ।
विवाहसोहळा संपल्यावर कलिंगनरेश इत्यादी गर्वि÷ राजे रुक्मीला म्हणाले, ‘तू बलरामाला द्यूतात जिंकून दाखव. हे राजा रुक्मी, बलरामाला द्यूत खेळता येत नाही. परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे.’ हे राजे रुक्मीचे पक्षपाती होते. त्यांनी बलरामाला द्युतात पराभूत करून कृष्ण बलरामाने पूर्वी त्यांचा जो पराभव केला होता त्याचा बदला घ्यावा असे रुक्मीला सुचवले.
राजे घेऊनि स्वपक्षपाती । रामकृष्णांतें प्रार्थूनि निगुते । द्यूतक्रीडेचिये आर्ती । क्षणैक समस्तीं बैसावें।
उद्धवप्रमुख बैसिजे तुम्हीं । बळरामेंसीं खेळूं आम्ही।
क्षत्रिय द्यूतीं कां संग्रामीं । विमुख न होती आमंत्रितां । ऐसें ऐकूनियां वचन । उत्साहभरित संकर्षण ।
प्रतिज्ञापूर्वक करूनि पण । म्हणे आपण सिद्ध असों । उद्धव अक्रूर वदती बोला । म्हणती चिरकाळ जागर झाला ।
अंगीं उजगरा असे भरला । आजि या खेळा नादरिजे । प्रभाते जाणें द्वारकापुरा । आतां क्षणैक विश्रान्ति करा । घूर्मी दाटली असे नेत्रां । जडता गात्रा जाकळिते ।
हें ऐकोनि रुक्मि म्हणे । तुम्हीं अवश्य निद्रा करणें ।
आम्हांसमवेत संकर्षणें । द्यूत खेळणें आवश्यक।
भविष्य जाणोनियां हरि । सहसा कोणातें न निवारी । आपण स्वमुखें निद्रा करी । क्रीडा एरिं अदरिली।
कालिङ्ग प्रमुख राजे सकळी । येऊनि बैसले सभामंडळीं । राम रुक्मी क्रीडाशाळी । द्यूत खेळीं प्रवर्तले ।
सर्व राजांनी बलरामापाशी येऊन त्याला द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले. बलरामाने ते आनंदाने स्वीकारले. उद्धव अक्रूर इत्यादी यादव वीर म्हणाले की आता खूप उशीर झाला आहे व आम्हाला उद्या पहाटेच द्वारकेकडे परतायचे आहे. त्यांनी द्यूत खेळायला नकार दिला. पण रुक्मीच्या आग्रहामुळें बलराम द्यूत खेळायला बसला. भविष्य जाणून भगवंताने कोणताही हस्तक्षेप केला नाही.
Ad. देवदत्त परुळेकर