विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानपरिषदेत केला आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास योजना राबविण्यात आली. मात्र ही योजना अपयशी ठरली आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये उद्योग व्यवसायच उभे राहिले नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने घेणे महत्त्वाचे असून तातडीने नवीन उद्योग व्यावसायिकांना संधी द्यावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य व्ही. बी. व्यंकटेश यांनी केली. यावर लघुउद्योग मंत्री एन. नागराजू यांनी मेक ईन इंडियाअंतर्गत आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायांना आम्ही प्राधान्य देत असल्याचे त्यांनी विधानपरिषद सभागृहात सांगितले.
मेक ईन इंडिया यामध्ये आपला देश स्वावलंबी बनण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. मिठापासून सर्व काही देशातच उत्पादन व्हावे, यासाठी उद्योग व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे. यावर व्ही. बी. व्यंकटेश यांनी गेल्या दोन वर्षांपासून एकही व्यवसाय सुरू झाला नाही. अनेकांनी व्यवसायासाठी जमिनी घेतल्या. मात्र त्या जमिनींमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे केवळ जमिनी घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्याचे सांगितले.
कोविडकाळात ही समस्या उद्भवली आहे. मात्र आता यामध्ये प्रगती झाली असून निश्चितच येत्या काही महिन्यांमध्ये अमुलाग्र बदल होईल. 5 लाख लोकांना आम्ही नोकऱया देणार, असा निश्चय केला आहे. त्या लवकरच देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. उद्योग सुरू करताना अनेक समस्या भेडसावत आहेत. कामगार कार्यालय आणि इंडस्ट्रीयल डेव्हल्पमेंट विभागामध्ये ताळमेळ नाही. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे गरजेचे असल्याचे व्ही. बी. व्यंकटेश यांनी यावेळी सांगितले.
एक खिडकी योजनेतून चालना द्या…
उद्योग सुरू करताना अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जमिनीचे भूपरिवर्तन करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर इतर ज्या अटी आहेत त्या पूर्ण करताना समस्या निर्माण होत आहे. तेव्हा तातडीने एक खिडकी योजना सुरू करून उद्योग व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी व्यंकटेश यांनी सभागृहात केली आहे.