राहुल गांधींचा आणखी एक व्हिडीओ प्रसारित, काँगेसची पुन्हा अडचण
हैदराबाद / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये आपल्या मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने गेलेल्या आणि तेथे एका नाईटक्लबमध्ये चीनी महिलेसमवेत व्हिडीओत दिसलेल्या राहुल गांधी यांनी भारतात आल्यानंतर आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. आपल्या 2 आठवडय़ांच्या विदेश दौऱयानंतर भारतात परतलेले राहुल गांधी 2 दिवसांच्या तेलंगणा दौऱयावर गेलेले आहेत. मात्र, तेथे एका कार्यक्रमात त्यांना कोणत्या विषयावर भाषण करावे लागणार आहे, याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती. ऐनवेळी त्यांनी ती चौकशी नजीकच्या काँगेस नेत्यांकडे केली, हे दर्शविणारा व्हिडीओ भाजपच्या मिडीया कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे.
हा 17 सेकंदांचा व्हिडीओ आहे. यात राहुल गांधी काही काँगेस नेत्यांसमवेत बसलेले दिसतात. ते या नेत्यांना विचारतात की, आज कार्यक्रमात मला काय बोलायचे आहे, आजच्या कार्यक्रमाचा मुद्दा काय आहे? याचा अर्थ राहुल गांधी आपले राजकारण गंभीरतेने घेत नाहीत. विदेश दौरे आणि नाईटक्लब्ज यांच्यातून वेळ मिळेल तेव्हा ते राजकारण करतात. त्यामुळे ज्या कार्यक्रमात त्यांना बोलायचे असते, त्या कार्यक्रमाची नीट माहितीही ते आधी करुन घेत नाहीत. ऐनवेळी ती माहिती विचारुन नंतर ते सुचेल तसे बोलतात. राजकारण हा गंभीरपणे आचरणात आणण्याचा विषय आहे, हे राहुल गांधींना कधी समजणार, अशा अर्थाचे ट्विट अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केले आहे.
मुंबईवर हल्ला झाला तेव्हा…
2008 मध्ये मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता, तेव्हाही राहुल गांधी नाईटक्लबमध्येच होते. नंतरच्या काळात काँगेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला होता आणि तो तीव्रतेने चव्हाटय़ावरही आला होता, त्या काळातही राहुल गांधीचे नाईट क्लब जाणे चुकले नव्हते. त्यांच्या राजकारणात सातत्य नसले, तरी त्यांच्या नाईटक्लब आयुष्यात मात्र खूपच सातत्य दिसून येते. देशात किंवा काँगेसमध्ये जेव्हा जेव्हा काही गंभीर घडत असते तेव्हा राहुल गांधी हमखास नाईटक्लबमध्ये दिसून येतात, असा खोचक टोलाही मालवीय यांनी लगावला.
सोशल मीडियातून टीका
राहुल गांधी यांच्या खुशालचेंडू वर्तनावर सोशल मीडियावरुन मोठय़ा प्रमाणात टीका होत असते. ते नेहमी यासाठी ट्रोल होत असतात. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राहुल गांधींवर बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. अलिकडच्या काळात अशी टीका त्यांच्यावर वांरवार होत आहे.