क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या, भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील एक झुंजार सेनानी, हैदराबाद मुक्ती, गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न, दुष्काळी चळवळ आणि शेतकरी शेतमजूर कष्टकऱयांच्या प्रश्नांसाठी आपले 97 वर्षाचे आयुष्य खर्ची घातलेल्या क्रांती विरांगणा हौसाबाई पाटील यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. क्रांतीची एक धगधगती मशाल शांत झाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढय़ात उतरलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आयुष्यात जितके दुःख, कष्ट आले, त्या सर्वांना क्रांतिसिंहांनी हसत-हसत स्वीकारले. घरादारावर सरकारने जप्ती आणली. प्रसंगी अंगावर पोते-तटकाराचे कपडे शिवून ते पोतेबुवा बनून राहिले. पण, आपल्या ध्येयापासून दूर झाले नाहीत. त्याच क्रांतीचा वसा घेऊन त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या क्रांतीविरांगणा हौसाताई पाटील यांनीही त्यांच्याच प्रमाणे संपूर्ण आयुष्य वेचले. हौसाताई अवघ्या चार वर्षांच्या असताना त्यांचे मातृछत्र हरपले. पण क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हीच आपली वंशज मानले. मातेचे छत्र नाही आणि पित्याची देशासाठीचे प्रतिबद्धता लक्षात घेतली तर बालपण एकाकीच गेले. मात्र त्या चिमुकल्या वयातच हाती तिरंगा घेऊन आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत त्या क्रांतिकार्यात आल्या. ब्रिटिशांचे जुलमी साम्राज्य नष्ट करण्यासाठी सशस्त्र लढय़ात त्यांनीही सहभाग घेतला. तो काळ आणि ती क्रांतीची-प्रतिसरकारची भूमीच इतकी सकस होती की सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियासुद्धा चवताळून त्या कार्यात उतरल्या होत्या. प्रसंगी हाती बंदुका घेऊन ब्रिटिशांची लढायला ही त्या मागे राहिल्या नाहीत. तत्कालीन दक्षिण सातारा आणि आजच्या सांगली जिह्याच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात अनेक रणरागिणींचे कार्य इतिहासात चमकून उठलेले आहे. डॉ. लीलाताई पाटील, राजूताई बिरनाळे, लक्ष्मीबाई नायकवडी, विजयाताई लाड, गंगूबाई लाड यांच्या बरोबरीने हौसाताई पाटील यांनी हातात शस्त्र घेऊन प्रत्यक्ष लढय़ात सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढय़ात सातारच्या प्रतिसरकार चळवळीने इतिहास निर्माण केला. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतीवीर नाथाजी लाड, पांडू मास्तर, बर्डे गुरूजी, क्रांतीवीर भगवानराव बाप्पा पाटील यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांनी इतिहास घडविला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष लढय़ात सहभाग घेणाऱयात हौसाताई आघाडीवर होत्या. गोव्यातून शस्त्र आणण्यासाठी हौसाताई जी. डी. बापू लाड यांच्याबरोबर गेल्या होत्या. मांडवी नदीची खाडी रात्रीच्या वेळी पोहून आणि जंगलातून पायी प्रवास करून आपल्यावर सोपविलेली कामगिरी त्यांच्या तुकडीने फत्ते केली. श्रीमंत कोकाटे यांनी या कार्याची तुलना मांडवी पार करणाऱया छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे. भवानीनगर रेल्वे स्टेशनवरील पोलिसांच्या बंदुका आणि धन त्यांनी काढून आणले. वांगीचा डाक बंगला जाळणे आणि सुर्ली घाटातील चेक पोस्ट लूटीत त्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष लढय़ातील या सहभागाशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुरबुरी, घरगुती अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. हैदराबाद संस्थान विलीनीकरण, गोवामुक्तीच्या आंदोलनात देखिल त्यांनी आजी गोजराबाई यांना सोबत घेऊन सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौसाताईंच्या संघटन कौशल्य दिसले. मुंबई, दिल्लीच्या मोर्चासाठीही त्यांचे कौशल्य दिसून आले. सीमाप्रश्नी संघर्ष करताना निपाणी येथे महिला सत्याग्रहींच्या मोर्चाचे नेतृत्व करून चार महिने हिंडलगा जेलमध्ये करावासही भोगला. या संघर्षात त्यांच्याबरोबर ग्रामीण भागातील अडाणी घर, प्रपंच सांभाळणाऱया स्त्रियांना त्यांनी सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यानंतर असो की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर, जनतेचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून लढा सुरूच राहिला. 1965 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर महागाई विरोधात प्रचंड आंदोलन छेडले गेले. कोल्हापूरमधील प्रचंड मोर्चावर गोळीबार झाला. गोळीबारात चार मोर्चेकरी बळी पडले. त्यावेळी खानापूर तालुक्मयात शेकापक्षाने 7 दिवस दररोज मोर्चाचे आयोजन केले होते. पोलिसांनी मोर्चे सुरू होण्यापूर्वी भाई भगवानराव पाटील व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यासह 100 ते 125 प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून येरवडय़ाला नेले होते. फक्त भाई सदाशिव बापू पवार पोलिसांना सापडले नव्हते. त्यावेळी प्रचंड दडपणातही हौसाताई आणि सदाशिव बापू यांनी हे सात मोर्चे यशस्वी केले. त्या सातही मोर्चाचे नेतृत्व हौसाताईंनी केले होते. प्रतिकुल परिस्थितीत सातत्याने संघर्ष करण्याचा त्यांचा इरादा भक्कम होता. सांगली जिह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहंकाळ, तासगाव हे कायम दुष्काळी तालुके. आज या भागातील स्थिती बदलू लागली आहे. मात्र पन्नास वर्षांपूर्वी जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी यासाठी सरकारशी संघर्ष अटळ होता. यावेळी हौसाताई या कष्टकरी स्त्रियांना बरोबर घेऊन अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या. पती माजी आमदार भगवानराव बाप्पा पाटील आणि हौसाताई यांनी आपले रचनात्मक कार्यातही नेतृत्व सिद्ध केले. हणमंतवडिये येथे 1985 पासून 2003 पर्यंत तीन वेळा दुष्काळी जनावरांसाठी चारा छावण्या काढल्या होत्या. छावण्यांमध्ये केवळ जनावरांचे प्रश्न नसतात. छावणीमध्ये मुक्कामाला शेतकरी घरातील महिला देखिल असायच्या. त्यांचे प्रश्न काय आहेत? याची त्या आस्थेवाईकपणे चौकशी करुन सोडवले. ताकारी-टेंभू-आरफळ योजनांची पूर्तता हा दुष्काळी विभागातील अत्यंत जिव्हाळय़ाचा प्रश्न. 2003 साली विटा तहसिलदार कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाने पुत्र ऍड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली 103 दिवस धरणे आंदोलन केले. कचेरीसमोर 35 ते 40 जनावरे बांधली होती. या आंदोलनात हौसाताई पाटील सहकारी महिलांसह सहभागी झाल्या. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्नांवर आपली भूमिका ठामपणे मांडत होत्या. अखेरच्या काळापर्यंत आपल्या विचारांशी प्रामाणिक क्रांतिसिंह यांच्या कन्येला तरुण भारत परिवाराचे विनम्र अभिवादन.
Previous Articleत्रिपाठी-अय्यरच्या वादळात मुंबई इंडियन्सचा धुव्वा
Next Article नियतीने पुन्हा आणलं
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.