वृत्तसंस्था/ मेलबोर्न
कोरोना व्हायरस महामारीमुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. सदर स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे यशस्वी करण्याकरिता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने काही सूचना केल्या आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंना आणण्याकरिता चार्टर विमानांचा वापर करावा, असे हॉगने म्हटले.
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. दरम्यान कोरोना व्हायरस महामारीमुळे ऑस्ट्रेलियात 10 महिन्यांच्या कालावधीसाठी व्यावसायिक हवाई सेवेवर बंधन घालण्यात येणार आहे. सदर स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होणार नसल्याचा अंदाज बऱयाच व्यक्तींकडून व्यक्त केला जात आहे पण हॉगला ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल, अशी आशा वाटते.
आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द केली जावू नये, कारण संपूर्ण जगामध्ये लाखो क्रिकेट शौकिनांची निराशा होईल. सदर स्पर्धा प्रेक्षकविना बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविली तरी लाखो शौकिनांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. पुढीलवर्षी भारतामध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सहा किंवा आठ महिन्यांच्या कालावधीत आयसीसीच्या दोन स्पर्धा खेळविणे योग्य होणार नाही. यासाठी ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयोजकांना विशिष्ट आराखडा तयार करावा लागेल. कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर लॉकडाऊनची अंमलबजावणी असल्याने बऱयाच क्रिकेटपटूंना या स्पर्धेसाठी उपलब्ध राहता येणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दीड महिन्यांचा कालावधी बाकी असताना क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात घेऊन येण्यासाठी चार्टर विमानांचा वापर करणे उपयुक्त ठरेल. कारण या कालावधीत व्यावसायिक विमानसेवा उपलब्ध असू शकणार नाही, असे हॉगने म्हटले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक व्यक्तींची विमानतळावर कोरोना चांचणी घेतली जावी आणि त्यानंतर त्यांना दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. त्यानंतर पुन्हा त्यांची कोरोना चांचणी घेतली जावी. या चांचणीत ते कोरोनामुक्त असतील तर त्यांना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यावी, असे हॉगने शेवटी सांगितले. ऑस्ट्रेलियातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकविना खेळविणे खूपच अवघड असल्याचे मत माजी कर्णधार ऍलन बोर्डर तसेच विद्यमान अष्टपैलू मॅक्सवेलने व्यक्त केले आहे.