क्रिकेटच्या 19 वर्षांखालील जागतिक चषक स्पर्धेची घोषणा झाली आहे. भारतही आपला संघ पाठविणार आहे. या संघाची निवडही झाली आहे. या भारतीय संघात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील ‘त्रिलोकीनाथ क्रिकेट ऍकेडमी’ नामक संस्थेच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अजय शर्मा हे या संस्थेचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आज त्यांचा उल्लेख आधुनिक द्रोणाचार्य असा होत आहे. त्यांनी लठ्ठ वेतनाची नोकरी सोडून क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची संस्था सुरु केली. आज या संस्थेच्या खेळाडूंना चमकण्याची संधी मिळाली आहे.
ते स्वतः चांगले खेळाडू होते. तथापि, त्यांना काही कारणांमुळे संधी मिळाली नाही. तथापि, त्यांचे क्रिकेटप्रेम यामुळे कमी झाले नाही. उलट आपल्या कौशल्याचा उपयोग त्यांनी होतकरु खेळाडूंना होऊ दिला. स्वतःला संधी मिळाली नाही तर नाही, निदान उदयोन्मुख खेळाडूंना तरी ती प्राप्त व्हावी यासाठी आपले ‘तन, मन, धन’ अर्पण करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी 2016 मध्ये सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमधील आपली नोकरी व्हीआरएस घेऊन सोडली आणि क्रिकेट प्रशिक्षण संस्था सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या.
आज त्यांची क्रिकेट प्रशिक्षण संस्था नावारुपाला आली आहे. अनेक खेळाडू तेथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळण्यास प्रारंभ झाला आहे कारण त्यांच्या संस्थेचे दोन खेळाडू आज भारतीय 19 वर्षांखालील संघात समाविष्ट झाले आहेत. विकेटकीपर फलंदाज म्हणून आराध्य यादव आणि फलंदाज म्हणून सिद्धार्थ यादव या त्यांच्या दोन ‘विद्यार्थ्यां’चा समावेश भारतीय संघात झाला आहे. आपल्या या दोन्ही शिष्यांचा शर्मा यांना मोठा अभिमान आहे. पुढे जाऊन हे खेळाडू भारताच्या मुख्य संघातही प्रवेश मिळवतील आणि क्रिकेट क्षेत्रात स्वतःचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास ते व्यक्त करतात. आराध्य याचा मोठा भाऊ अंकितही त्यांचा शिष्य आहे. आपले अनेक विद्यार्थी गुणवान असून त्यांना संधी मिळताच ते तिचे सोने करतील यासंदर्भात त्यांना शंका नाही. क्रिकेटसाठी त्यांनी केलेल्या या परीश्रमांमुळे त्यांनाही बरीच प्रसिद्धी मिळाली असून त्यांचे या भागात मोठाच आदर केला जात आहे.