आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणताही असो. त्यात पावसाचा व्यत्यय येणार, असा अंदाज आला, स्टेडियम परिसरात काळे ढग दिसू लागले तर सर्वांच्या तोंडी एकच वाक्य येते, ते म्हणजे डकवर्थ-लुईस!
डकवर्थ-लुईस पद्धतीचा अवलंब होणार म्हटल्यावर भल्याभल्यांची आजही तारांबळ उडते. याचे कारण म्हणजे ही पद्धत लागू केल्यानंतर चेंडूचे आणि धावांचे समीकरण कसे होईल, याचा अंदाज भल्याभल्या गणितज्ञांना देखील लागत नाही. डकवर्थ-लुईस पद्धतीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक प्रकोप झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर याची रंजक झलक!
कोण हे लुईस महाशय?
टोनी लुईस हे ब्रिस्टॉलमध्ये वसलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडमधील मॅनेजमेंट सायन्सचे व्याख्याते. सर्वप्रथम 1999 मध्ये सहकारी गणितज्ञ प्रँक डकवर्थ यांच्यासह केलेल्या गणिती पद्धतीमुळे ते प्रकाशझोतात आले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास सुधारित लक्ष्य देण्यासाठी एखादी गणिती पद्धत असावी, यासाठी आयसीसीने याचा अधिकृत स्वीकार केला व यामुळे स्टार क्रिकेटपटूंनंतर क्रिकेटमुळे ज्यांचे नाव सातत्याने चर्चेत राहिले, अशा यादीत डकवर्थ-लुईस यांना सन्मानाने प्रवेश मिळाला!
डकवर्थ व लुईस यांच्या नावानंतर एमबीई का?
लुईस यांचे पूर्ण नाव टोनी लुईस असे असले तरी ते त्यांच्या नावासमोर एमबीई असे संबोधन लावायचे. कारण, लुईस यांना 2010 मध्ये एमबीई पदवी बहाल करण्यात आली होती. एमबीईचा अर्थ मेम्बर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर, असा आहे. लुईस यांच्याबरोबरच डकवर्थ यांनाही त्याच बरोबरीने एमबीई पदवी दिली गेली आहे.
सुरुवात कशी झाली?
वास्तविक, 1980 च्या दशकातच हा फॉर्म्युला तयार केला गेला होता आणि आयसीसीसमोर ते मांडलेही गेले होते. पण, त्यातील क्लिष्टता आणि गुंतागुंत यामुळे, आयसीसीने ते तातडीने अंमलात आणणे टाळले. अर्थात, दुसऱया बाजूने आयसीसीला पावसाचा व्यत्यय आल्यास त्यावर कसा मार्ग काढायचा, यावर काहीही पर्याय शोधता आला नव्हता. पुढे, 1992 मध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी कॉन्फरन्समध्ये डकवर्थ यांनी ‘फेयर प्ले ईन फॉल वेदर’ सादर केले आणि त्याने प्रभावित लुईस यांनी डकवर्थ यांच्यासह एकत्रित रचनेवर काम सुरु केले.
कसा ठरवला जातो फॉर्म्युला?
डकवर्थ-लुईस फॉर्म्युला अतिशय किचकट, क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे. कारण, यात प्रत्येक संघाच्या डावातील कमी धावा झालेले षटक वगळले जातात आणि त्यानंतर सांख्यिकी मांडून त्यानुसार, सुधारित लक्ष्य देण्यात येते. फलंदाजी करणाऱया संघासाठी राहिलेले विकेटस् व राहिलेली षटके यात महत्त्वाची ठरतात. 1997 मध्ये प्रत्यक्ष एखाद्या सामन्यात हा फॉर्म्युला अवलंबला गेला. मालिकेतील दुसऱया वनडेत झिम्बाब्वेने सर्वबाद 200 धावा केल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि इंग्लंडला 42 षटकात 186 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. इंग्लंडला तो सामना 7 धावांनी गमवावा लागला होता.
डकवर्थ-लुईस पद्धतीत स्टर्नचा समावेश का?
प्रारंभी ही पद्धत डकवर्थ-लुईस या नावानेच ओळखली जायची. कारण, प्रँक डकवर्थ व टोनी लुईस यांचाच समावेश होता. याच उभयतांनी ही पद्धत सुरु केली. पण, 1992 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात या डकवर्थ-लुईस नियमामुळे जो वाद निर्माण झाला, त्याने बरीच खळबळ उडाली आणि याचाच भाग म्हणून यात बदल केले गेले. स्टीव्हन स्टर्न यांनी सुचवलेल्या सुधारणा कालांतराने त्यात सामील करण्यात केल्या गेल्या. याचे श्रेय स्टर्न यांनाही मिळावे, यासाठी या पद्धतीला डीएलएस अर्थात डकवर्थ-लुईस-स्टर्न असे संबोधन देण्यात आले. स्टर्न हे ऑस्ट्रेलियन प्रोफेसर आहेत.
स्टर्न यांना ती कल्पना का सुचली?
डकवर्थ व लुईस यांच्यात डकवर्थ हे अधिक स्पष्टवक्ते. एकदा रेडिओवर ख्रिस्तोफर मार्टिन-जेन्किन्स यांचे समालोचन सुरु होते. ते डकवर्थ ऐकत होते. यावेळी समालोचनात ख्रिस्तोफर म्हणाले की, ‘या फॉर्म्युल्यात कोणी काही सुधारणा केली तर फार बरे होईल’! त्यावेळी डकवर्थना लक्षात आले की, या गणिती समस्येला गणिती उत्तरच आवश्यक आहे आणि त्यानुसार स्टर्न यांनी सूचवलेल्या सुधारणांचा अंमल केला गेला.
डकवर्थ-लुईस पद्धत अंमलात आली, पण….
ज्या चार्टने संघासमोर षटकनिहाय टार्गेट काय असेल हे ठरवले जाते, ते प्रत्यक्ष समोर असल्याशिवाय समजणे कर्मकठीण असायचे, त्यासाठी डकवर्थ-लुईस पद्धत अंमलात आली. पण, काही वेळा क्लिष्ट गणिती रचनेमुळे भल्याभल्या संघांना देखील सुधारित लक्ष्य काय असेल, याची खात्री देता येत नाही, ही आजची देखील स्थिती आहे. यासाठी 2003 वर्ल्डकप विश्वचषकाचे उदाहरण सर्वोत्तम ठरावे. त्यावेळी श्रीलंकेविरुद्ध दरबान येथील झालेल्या सामन्यात केलेल्या चुकीचा फटका म्हणून सहयजमान दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले होते.
टी-20 क्रिकेटसाठी डीएलएस अयोग्य
क्रिकेटचा सर्वात छोटेखानी प्रकार म्हणजे 20 षटकांचा. या टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास डकवर्थ-लुईस पद्धत अजिबात लागू होत नाही, अशी टीका सातत्याने झाली आहे. डकवर्थ-लुईस नियम स्थापला गेल्यानंतर काही वर्षांच्या अंतराने टी-20 क्रिकेटचा जन्म झाला. पण, आयसीसीला अनुकूल अशी एकही पर्यायी पद्धत त्यानंतरही शोधता आलेली नाही, ही कटू वस्तुस्थिती आहे.
1992 वर्ल्डकपची सेमीफायनल
डकवर्थ-लुईस पद्धतीने जे बरेच वाद निर्माण केले, त्यात 1992 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीचा प्राधान्याने समावेश होतो. सिडनीत झालेल्या त्या लढतीत दक्षिण आफ्रिका-इंग्लंडचे संघ झुंजत होते. धावांचा पाठलाग करणाऱया दक्षिण आफ्रिकेसमोर इंग्लंडला नमवण्यासाठी 13 चेंडूत 22 धावांचे आव्हानात्मक पण, आवाक्यातील टार्गेट होते. मात्र, याचवेळी पावसाचा व्यत्यय आला आणि डकवर्थ-लुईस पद्धतीचा अवलंब झाल्यानंतर सुधारित लक्ष्य देण्यात आले ते चक्क एका चेंडूत 22 धावांचे!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात अर्थातच यामुळे प्रचंड खळबळ उडाली. पण, डकवथöलुईस पद्धत मात्र त्या घटनेत तावून सुलाखून देखील जैसे थे राहिली!
–विवेक कुलकर्णी