वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नैरोबी येथे झालेल्या यू-20 वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचे भारतात आगमन झाल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी त्यांची भेट घेतली.
भारताने या स्पर्धेत 2 रौप्य व एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळविली. भविष्यात होणाऱया आशियाई, राष्ट्रकुल व ऑलिम्पिक यासारख्या स्पर्धांत आपले युवा खेळाडू निश्चितच चमक दाखवतील, असा विश्वास क्रीडामंत्री ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. आनंदाने साजरे करावे, असे यश तुम्ही मिळविले असून भविष्यातील तुम्ही भारताचे आशास्थान आहात. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर तुम्ही केलेली कामगिरी निश्चितच प्रशंसनीय असून कठीण काळावर मात करून तुम्ही हे यश मिळविले आहे, अशा शब्दांत ठाकुर यांनी त्यांचे कौतुक केले.
भरत एस., प्रिया मोहन, सुमी व कपिल या 4ƒ400 मी. मिश्र रिले संघाने या स्पर्धेत कांस्य मिळविले तर रेसवॉकर अमित खत्री व लांब उडीपटू शैली सिंग यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात रौप्यपदके मिळविली. भारताकडे राखीव खेळाडूंची उत्तम फळी असून त्यांना घडविण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही ठाकुर म्हणाले.