सविता राव या ‘क्लीन प्लॅनेट’ या छोटेखानी उद्योगाच्या संस्थापिका. 2010 मध्ये उत्तर ध्रुवावरचा बर्फ वेगाने वितळत असल्याबाबतचा लेख त्यांच्या वाचनात आला. आपल्या आसपाचं वातावरण किती बिघडत चाललं आहे, याची त्यांना तेव्हा कल्पना आली. पर्यावरणाच्या प्रचंड हानीमुळे पृथ्वीची ही अवस्था झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्या ‘सोल क्वेस्ट’ नावाची कंपनी चालवायच्या. ही कंपनी वत्र आणि प्रावरणांची निर्मिती करत असे. ही प्रावरणं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी जात असत. त्याच सुमारास सविता पुरुषांचे कपडे आणि ऍक्सेसरीजचा ब्रँड सादर करण्याच्या तयारीत होत्या. पण हा लेख वाचल्यानंतर त्या चांगल्याच हादरल्या. हा ब्रँड बाजारात आणण्याची सगळी तयारी झाली असताना, पैसा गुंतवलेला असताना त्यांनी ही सगळी योजना गुंडाळून ठेवली. इथे त्यांनी नफ्या-तोटय़ाचा अजिबात विचार केला नाही.
पर्यावरणाचं रक्षण करणारी पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. असा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार सविताजींच्या मनात घोळू लागला. देशातल्या वत्रोद्योगाला चालना देण्याचाही विचार त्यांच्या मनात डोकावला. स्थानिक कलाकारांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचा विचार त्या करू लागल्या. त्यातूनच 2013 मध्ये ‘क्लीन प्लॅनेट’ची स्थापना झाली.
‘क्लीन प्लॅनेट’
या बॅनरअंतर्गत त्यांनी पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती सुरू केली. त्यांनी टोटे आणि स्लिंग बॅग बाजारात आणल्या. यानंतर लॅपटॉप बॅग्ज,
लॅपटॉप स्लीव्हज, ग्रोसरी बॅग्जची निर्मिती सुरू झाली. ‘क्लीन प्लॅनेट’मुळे
500 कुटुंबांना आधार मिळाला आहे. या बॅंडअंतर्गत जवळपास
150 उत्पादनांची निर्मिती होते. महिन्याला दहा हजार
वस्तू खपतात. सविता यांनी रसायनशास्त्रामध्ये पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एमएमएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
1995 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वत्रोद्योगाच्या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. या काळात त्यांचा जपानी बाजारपेठांशी संबंध आला. जपानी कंपन्यांची काम करण्याची पद्धत त्यांना भावली. या कंपनीत त्यांनी दहा वर्षं काम केलं. मग नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू केला. सविता डिझायनिंगच्या कामात लक्ष घालतात. आपलं उत्पादन पूर्णपणे पर्यावरणपूरक असावं,
असा त्यांचा प्रयत्न असतो. आपली पृथ्वी प्रदूषणमुक्त रहावी यासाठी सविता यांनी खारीचा वाटा उचलला आहे.
पृथ्वीचं तापमान वाढतंय. आपण सर्वच याचे गंभीर परिणाम भोगत आहोत. पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. प्लास्टिकचा भस्मासूर या पृथ्वीला गिळंकृत करण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असूनही अनेकांना आपली, पुढच्या पिढय़ांची काळजी नाही. प्लास्टिकचा वापर अजूनही सुरूच आहे. लोक जीवनशैलीत थोडेफार बदल करायला तयार नाहीत. पण सविता राव यांनी आपल्या उद्योगालाच नवी दिशा दिली. आता त्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात.