यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी व शेवटची टी-20 आज
सिडनी / वृत्तसंस्था
टी-20 मालिका यापूर्वीच खिशात टाकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आज (दि. 8) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात क्वीन स्वीपचा निर्धार असेल. ऑस्ट्रेलियन संघ अद्याप मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापतीच्या चिंतेत असून हीच त्यांची अडचण आहे. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होईल.
यापूर्वी, 2016 मधील दौऱयात भारतीय संघाचा वनडे मालिकेत फडशा पडला आणि टी-20 मालिकेतच ते मुसंडी मारुन वर आले होते. त्याची आठवण यंदा विराट कोहली व हार्दिक पंडय़ा यांच्यासाठी प्रकर्षाने ताजी झाली. त्या दौऱयातील टी-20 मालिकेत भारताने 3-0 अशी बाजी मारली होती, त्याचीच पुनरावृत्ती या दौऱयातही करण्याचा विराटसेनेचा प्रयत्न असणार आहे.
यंदाच्या ऑस्ट्रेलियन दौऱयातील पहिल्या दोन वनडेत भारताला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावे लागले. त्यानंतर कॅनबेरा येथील तिसऱया वनडे सामन्यापासून मात्र भारताने फासे पलटवले आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या रविंद्र जडेजाच्या गैरहजेरीत देखील भारताने विजयी धडाका त्यानंतर कायम राखला आहे, हे विशेष लक्षवेधी आहे. अगदी मोहम्मद शमी व जसप्रित बुमराह यांच्यासारख्या कसलेल्या गोलंदाजांना विश्रांती दिल्यानंतर एकत्रित 40 सामने देखील न खेळलेल्या युवा गोलंदाजांनी त्यांची धुरा उत्तम सांभाळली, हे आणखी एक फलित आहे.
टी. नटराजनवर मुख्य फोकस
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील नवा धुरंधर टी. नटराजन चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनत असून ऑस्ट्रेलियाच्या अव्वल फलंदाजांचेही अंदाज चकवण्यात त्याने सातत्य ठेवले आहे. नटराजनचा स्पेल आणि ऑस्ट्रेलियाला 10 धावा कमी जमवता आल्या, यावर हार्दिक पंडय़ाने लक्ष वेधले होते. तोच ऑस्ट्रेलियासाठी विजय व पराभवातील फरक अधोरेखित करणारा ठरला.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या मागील लढतीत दोन्ही संघांनी मधल्या षटकात कसा खेळ साकारला, हे देखील निकालावरुन स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड सुटली तर दुसरीकडे, भारतीय कर्णधार विराट कोहलीने एकापेक्षा एक सरस फटके लगावत आपल्या संघाला वर्चस्व प्राप्त करवून दिले. दुखापतग्रस्त मनीष पांडेच्या स्थानी श्रेयस अय्यरला संधी देणे देखील संघाच्या पथ्यावरच पडले आहे.
फिरकीपटू यजुवेंद्र चहलला सूर सापडला नाही, ही भारतासाठी एकमेव चिंता ठरली. गोलंदाजीत सहावा पर्याय उपलब्ध नसल्याने विराटला चहलकडून पूर्ण षटके गोलंदाजी करवून घ्यावी लागली.
ऑस्ट्रेलियाची स्टोईनिस-मॅक्सवेलवर भिस्त
ऑस्ट्रेलियासाठी हंगामी कर्णधार ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड यांची गैरहजेरी बरीच महागात पडली आहे. अर्थात, हे दिग्गज पहिल्या टी-20 सामन्यात खेळले, त्यावेळी तो सामना देखील भारतानेच जिंकला होता, हे लक्षवेधी ठरते. दोन सामन्यात डॅर्सी शॉर्टला सलामीच्या जागी न्याय देता आला नसून मार्कस स्टोईनिस व ग्लेन मॅक्सवेल यांनाच अधिक जबाबदारीने खेळावे लागेल आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांना अधिक नियंत्रित मारा करावा लागेल. प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा या टी-20 मालिकेत 3-0 असा धोबीपछाड करणे, हे विराटसेनेचे मुख्य लक्ष्य असून त्यात ते यशस्वी होतील का, हे येथे आज स्पष्ट होईल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन, शार्दुल ठाकुर.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), सीन ऍबॉट, मिशेल स्वेप्सन, ऍलेक्स कॅरे, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड, मोईसेस हेन्रिक्स, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोईनिस, डॅर्सी शॉर्ट, ऍडम झाम्पा, ऍन्डय़्रू टाय.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दु. 1.40 पासून.
कोटस
अनुभवी स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा एकदा नेतृत्व दिले तर तो अधिक प्रभावीपणे या जबाबदारीला न्याय देऊ शकेल, असे मला वाटते. अर्थात, शेवटची टी-20 व पहिली कसोटी यात बऱयाच दिवसांचा फरक असल्याने या कालावधीत कसोटी मालिकेसाठी पुरेशी तयारी करता येणे शक्य आहे.
-ऑस्ट्रेलियाचा हंगामी टी-20 कर्णधार मॅथ्यू वेड.