प्रतिनिधी / बेळगाव
माणसाच्या जगण्याची लढाई इतकी तीव्र झाली आहे की कोरोनाचे भय विसरून लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली. सोमवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी क्लोजडाऊनची घोषणा केली. त्यानंतर त्वरेने ही बातमी वाऱयासारखी पसरली. 15 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळतील की नाही, या चिंतेत असणाऱया नागरिकांनी बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत तसेच अन्य भागातील बाजारपेठेमध्येसुद्धा गर्दी केली.
सध्या लग्नसराईचा मोसम आहे. त्यामुळे सकाळी लग्नसराईच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत आले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा बाजारपेठेत भरणा होता. मात्र, दुपारी अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली आणि नागरिकांनी त्वरेने बाजारपेठ गाठली. प्रामुख्याने गहू, जोंधळा, तूरडाळ, चहापावडर, मीठ, रवा, साखर यांची खरेदी झाली. याशिवाय लग्नसराईसाठी आलेल्या मंडळींमुळे दुकानांमध्ये एकच गर्दी उसळली. नरगुंदकर भावे चौक येथे रहदारीची कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, लॉकडाऊनचा त्वरित फायदा भाजी विपेत्यांनी उचलला आणि भाज्यांचे दर भरमसाट वाढविले. दोन दिवसांपूर्वी 20 किंवा 30 रुपये किलो असणारा टोमॅटोचा दर 50 रुपये झाला. बटाटा 30 ते 40 तर कोथिंबीर 20 रुपयाला एक किंवा लहान आकाराची जुडी 30 रुपयांना दोन अशा दराने विक्री सुरू झाली. वांगी, भेंडी यांचेही दर वाढले. मुळात बाजारपेठेत भाजीची आवकही कमी होती आणि त्यातच दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली.